मेट्रोला मिळणार केंद्राचा ‘ग्रीन सिग्नल’
By admin | Published: August 13, 2014 12:47 AM2014-08-13T00:47:20+5:302014-08-13T00:47:20+5:30
उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला उद्या, बुधवारी केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे पीआयबी ची (पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्ड) बैठक होत
पीआयबीची आज दिल्लीत बैठक : सुधारित प्रस्ताव ठेवणार
नागपूर : उपराजधानीचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला उद्या, बुधवारी केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे पीआयबी ची (पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्ड) बैठक होत असून तीत या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे २१ आॅगस्ट रोजी नागपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्याची तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत. या प्रकल्पासाठी लागणाऱ्या सुमारे २ हजार कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती. त्यानंतर शासनाच्या मंजुरीसह वाढीव खर्चासह १० हजार ५२६ कोटी रुपयांचा सुधारित आराखडा तातडीने केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. संबंधित आराखड्यावर उद्या, बुधवारी दिल्ली येथे आयोजित पीआयबीच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. या बैठकीसाठी नगर विकास खात्याचे प्रधान सचिव यांच्यासह नासुप्रचे सभापती प्रवीण दराडे यांना देखील निमंत्रित करण्यात आले आहे. मेट्रोच्या आराखड्यास केंद्र सरकारच्या पीआयबीने मंजुरी दिली तर पुढील दोन दिवसात संबंधित प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी या प्रकल्पाचे भूमिपूजन करणार असल्यामुळे मंत्रिमंडळातही या प्रकल्पाला त्वरित मंजुरी मिळेल. (प्रतिनिधी)