मुंबई: सध्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीवरून (Andheri Bypoll) जोरदार रणधुमाळी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता दुहेरी संकट उभे ठाकल्याचे पाहायला मिळत आहे. एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मशाल या चिन्हावर समता पार्टीने आक्षेप घेतला असून, प्रसंगी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनाच गळाला लावण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही निवडणूक महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे लढवली जाणार आहे. यातच शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गोठवून केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाला नवे नाव आणि चिन्ह दिले आहे. यानंतर आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गट मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत असून, खुद्द एकनाथ शिंदे सक्रीय झाल्याचे सांगितले जात आहे. यावरून जयंत पाटील यांनी शिंदे गट आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
ठाकरे गटाचा उमेदवार शिंदे गटाने पळवणे, ही योग्य बाब आहे का?
अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचा उमेदवार शिंदे गटाने पळवणे, ही योग्य बाब आहे का? भाजप पक्ष सत्तेविना राहू शकत नाही. त्यामुळेच भाजपने शिवसेना पक्ष फोडला. शिवसेनेतील बंडाळी भाजपप्रणित होती. आता अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे त्याला साम-दाम-दंड-भेद वापरुन पळवायचा प्रयत्न सुरु आहे. ही महाराष्ट्रातील जनतेला आवडणारी गोष्ट नाही. अंधेरीत मराठी भाषिकांची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे तिथला निकाल काय येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. पण आता ठाकरे गटाचा तिथला उमेदवारच पळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशाने पुढच्या विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात कोणता उमेदवार उभा राहणार नाही, असे जयंत पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, हिंदुत्वाची मते जातील आणि आपल्याला सत्तेत येता येणार नाही यातूनच भाजपने शिवसेना पक्ष फोडला. शिवसेना फोडल्याचे खापर कोणावर तरी फोडायचे म्हणून भाजपकडून राष्ट्रवादीचे नावे घेतले जाते, असा दावा करत महाराष्ट्रभर शिवसेनेच्या आमदारांशी आमचे चांगले संबंध आहेत. उद्धव ठाकरेंच्या घरातील शिवसेना चोरीला गेली आहे, ती कोणाच्या घरी आहे हे थोड्या दिवसांनी कळेल, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"