स्नेहा मोरे, मुंबईबाल हक्क संरक्षण आयोगाने बालगोविंदावर बंदी घालून पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. मात्र तरीही दहीहंडी समन्वय समितीने ‘बालहट्ट’ कायम ठेवल्यामुळे उच्च न्यायालयात धाव घेऊन दहीहंडी उत्सवावर निर्बंध घालण्याबाबत याचिका दाखल केल्याचे याचिकाकर्ती स्वाती पाटील यांनी सांगितले. आता या निर्देशांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस आणि राज्य शासन कशा पद्धतीने पाऊल उचलते, याकडे लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.दहीहंडी उत्सवाचे झालेले बाजारीकरण थांबावे, एकमेकांवर करण्यात येणारी कुरघोडी थांबावी, उत्सवादरम्यान होणारे अपघात टळावे, त्यावर निर्बंध घालण्यात यावे, अशी आमची मागणी होती. त्यामुळे केवळ दहीहंडी उत्सवातील स्पर्धेला विरोध होता, या उत्सवाला नव्हे, अशी भूमिका दहीहंडी उत्सवाबाबत याचिका दाखल केलेल्या स्वाती पाटील यांनी स्पष्ट केली. गेल्या वर्षीही चेंबूर येथे उत्कर्ष महिला समिती आणि लोकसेवा सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून थरांवर निर्बंध येण्यासाठी आम्ही पथनाट्य आणि पत्रकांच्या माध्यमातून जनजागृती केली होती. या वर्षीसुद्धा ही मोहीम सुरू आहे, मात्र सराव शिबिरांदरम्यानही होणाऱ्या अपघातांमध्ये झालेली वाढ लक्षात घेता यावर कायमचे निर्बंध यावे यासाठी हा प्रयत्न केला. त्यामुळे आता उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्हच आहे. (प्रतिनिधी)
उत्सवाला नव्हे, स्पर्धेला विरोध
By admin | Published: August 13, 2014 3:27 AM