ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २७ - राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कसबा गणपती मंडळ, तांबडी जोगेश्वरी, तुळशीबाग मंडळ, गुरुजी तालीम आणि केसरीवाडा मंडळ या पाच मानाच्या गणपतीचे हौदात विसर्जन संपन्न झाले आहे. मानाच्या पाच गणपती सोबतच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, केसरीवाडा गणपती आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती या सर्व मानाच्या गणपतींचे विसर्जन दिमाखात पार पडले आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मानाच्या पाच गणेश मंडळांनी महापालिकेने तयार केलेल्या हौदात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे नेहमीपेक्षा यंदा या गणपतींचा विसर्जन सोहळा लवकर पार पडला. १२३ वर्षांच्या इतिहासामध्ये मानाच्या गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी प्रथमच असा निर्णय घेतला होता. पुण्यातील गणपती मिरवणुकांचे वैशिष्ट्य असलेल्या ढोल-ताशाच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यात आला. देखण्या पारंपरिक आणि शिस्तबद्ध मिरवणुका हे पुण्याच्या मिरवणुकांचं खास वैशिष्ट्य आहे. दरम्यान, पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने सकाळाच्या वेळेत पुणेकरांना कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. मात्र, तरीही पुणेकरांच्या उत्साहात काकणभरही फरक पडला नाही.
पुण्याच्या पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन संपन्न
By admin | Published: September 27, 2015 8:48 PM