रिक्षा, टॅक्सीचे भाडे दोन रुपयांनी वाढले
By admin | Published: August 13, 2014 03:40 AM2014-08-13T03:40:21+5:302014-08-13T03:40:21+5:30
गेल्या महिन्यात रेल्वे आणि लोकलचा प्रवास महागल्यानंतर आता मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रिक्षा, टॅक्सीतून प्रवास करणेही महागले आहे
मुंबई : गेल्या महिन्यात रेल्वे आणि लोकलचा प्रवास महागल्यानंतर आता मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत रिक्षा, टॅक्सीतून प्रवास करणेही महागले आहे. रिक्षा आणि टॅक्सींचे किमान भाडे दोन रुपयांनी वाढवण्याला उच्च न्यायालयाने मंगळवारी मंजुरी दिली. यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागणार आहे. दोन रुपये भाडेवाढीमुळे रिक्षाचे किमान भाडे १५ रुपयांवरून १७ रुपये तर टॅक्सीचे किमान भाडे १९ रुपयांवरून २१ रुपये होणार आहे.
न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले़ तसेच भाडेवाढ करण्याचे अधिकार शासनाला असून, तांत्रिक मुद्द्यांवर झालेल्या भाडेवाढीवर शिक्कामोर्तब करण्यास वारंवार शासनाला न्यायालयात येण्याची आवश्यकता नसल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले़ शासनाने नुकतीच ही भाडेवाढ जाहीर केली होती़ त्याविरोधात मुंंंबई ग्राहक पंचायतने अॅड़ उदय वारूंजीकर यांच्यामार्फत याचिका दाखल केली तर रिक्षा-टॅक्सी युनियनने ही भाडेवाढ तत्काळ लागू करावी, अशी मागणी करणारी स्वतंत्र याचिका दाखल केली़ त्यावर न्यायालयाने या भाडेवाढीचा मार्ग मोकळा केला़
मात्र मीटरच्या रिकॅलिब्रेशनशिवाय ही भाडेवाढ शक्य नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले. रिकॅलिब्रेशनपूर्वीच जादा भाडे आकारणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांवर कठोर कारवाई करू, असा इशारा अप्पर परिवहन आयुक्त सतीश सहस्रबुद्धे यांनी दिला आहे.