लोणावळ्यातील बंगल्यासाठीच शिवसेना नेत्यांचा ‘तो’ स्टंट
By admin | Published: September 10, 2016 03:18 AM2016-09-10T03:18:14+5:302016-09-10T03:18:14+5:30
वृक्षतोडीसंदर्भात कोणत्याही विकासकाचा प्रस्ताव आल्यास स्वत:च्या वैयक्तिक लाभासाठी शिवसेनेचे नेते आरडाओरड करतात.
ठाणे : गेल्या काही वर्षातील घटनांचा आढावा घेतल्यास वृक्षतोडीसंदर्भात कोणत्याही विकासकाचा प्रस्ताव आल्यास स्वत:च्या वैयक्तिक लाभासाठी शिवसेनेचे नेते आरडाओरड करतात. त्यानंतर ‘अर्थपूर्ण’ वाटाघाटी झाल्यास विरोधासाठी उठविलेला आवाज बंद होतो. सध्या जो विरोध केला जात आहे. त्याचा विचार केल्यास संबंधीत विकासकाचे लोणावळा येथे बंगले बांधण्याचे काम सुरु आहे. या प्रकल्पात स्वत:ला बंगला मिळवण्यासाठीच एका नेत्याने हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
परांजपे यांच्या या पत्रकानुसार संपूर्ण ठाणे शहरात उघड्या जागेवरील वृक्ष राजरोसपणे तोडले जात होते. तेव्हा पर्यावरणप्रेमी आपल्या परिने आवाज उठवत होते. त्यावेळी शिवसेना गप्प होती. नौपाडा येथील १०० वर्षांपूर्वीचे अनेक वृक्ष मूळासकट उपटून काढण्यात आले. त्यावेळीही शिवसेना गप्प होती. आता ती पुन्हा आक्र मक झाली आहे. मध्यंतरी कोलशेत येथे एका विकासकाने मोठ्याप्रमाणात वृक्षतोड केली होती. त्यावेळी शिवसेनेच्या एका आमदाराने रान उठविले होते. मात्र, अर्थपूर्ण घडामोडींनंतर हा विरोधाचा आवाज शांत झाला. आता पुन्हा एकदा ठामपामध्ये वृक्षतोडीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर शिवसेना मैदानात उतरली आहे. आजवर जवळजवळ हजारांच्या वर वृक्ष तोड झाली असताना गप्प राहिलेली शिवसेना वृक्षतोडीचा प्रस्ताव आला की वैयक्तिक लाभासाठी आवाज उठवित आहे. संबंधित विकासकाचे लोणावळा येथे बंगलो प्रोजेक्ट सुरु असून त्याठिकाणी बंगला मिळविण्यासाठी एका नेत्याने हा प्रकार घडवून आणला आहे. दिशाहीन झालेल्या शिवसेनेचा हा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत. सत्ताधारी जेव्हा भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकतात. तेव्हा नोकरशहा मजबूत होतो. एका प्रकरणासाठी आठ आठ तास मुक्काम ठोकून बसलेल्या शिवसेना नेत्यांना ठाणेकरांच्या समस्या दिसत नाहीत, असा टोलाही परांजपे यांनी लगावला आहे. (प्रतिनिधी)
>ठाणे महापालिका प्रशासन भ्रष्टाचाराने बरबटले आहे, असा आरोप करणारी सत्ताधारी शिवसेना पालिका बरखास्तीची मागणी का करीत नाही, असा सवाल करून परांजपे म्हणाले, त्यांनी अशी मागणी केली, तर आम्ही त्या मागणीला समर्थन देऊ. अन्यथा, आम्हीच आता तशी मागणी करु ; त्याला तुम्ही समर्थन द्या, असे तिरकस आवाहनही त्यांनी केले.