लोकमत न्यूज नेटवर्कमालवण (सिंधुदुर्ग) : अवघ्या महाराष्ट्राची शान असलेला आणि ३५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा सांगणारा ‘सिंधुदुर्ग किल्ला विकणे आहे’ असा मजकूर लिहिलेले चार फलक शहरात लावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. सोमवारी सकाळी हे फलक दिसल्यापासून शिवप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या. शहरातील वर्दळीच्या ठिकाणी लावलेले हे फलक पोलिसांनी तातडीने हटविले, परंतु तोपर्यंत ही बातमी सोशल मीडियातून व्हायरल झाली. त्यानंतर, राज्यभरातील शिवप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मालवण शहरात वायरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत किल्ले सिंधुदुर्ग गेली ३५० वर्षे समुद्राच्या लाटांशी झुंज देत, गौरवशाली इतिहासाची साक्ष देत उभा आहे. याच महिन्यात या किल्ल्याच्या ३५० वा वर्धापन दिन सोहळ्याची सांगता होणार आहे. असे असताना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास समाजकंटकांनी हे फलक लावले. याचा येथील किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीनेही जाहीर निषेध करीत, कडक कारवाई करण्याची मागणीही निवेदनाद्वारे केली आहे.
‘सिंधुदुर्ग किल्ला विकणे आहे’!
By admin | Published: May 09, 2017 2:25 AM