ऑनलाइन लोकमत
टिटवाळा, दि. 01 - ऐन भाऊबीजेच्या दिवशीच तीन भावंडांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याणजवळच्या टिटवाळा येथील मांडा कोळी वाड्यात रहाणारे साईनाथ संजय भोईर (16), जिवन (बंटी)संजय भोईर(13) व साईनाथ संतोष भोईर (9) या तीन मुलांचा बुडून मृत्यू झाला. एकाच घरातील मुलांचा असा बुडून मृत्यू झाल्याने या घटनेमुळे मांडा गावात सणासुदी दु:खाचे सावट कोसळले आहे. परिसरातून या घटने बाबत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मांडा-टिटवाळा पश्चिम कोळी वाड्यात रहाणारे भोईर कुटूंब. यातील दोन सख्खे व एक चुलत भाऊ असे तिघे जण व इतर दोन अशी पाच मुलं दुपारी तीन ते चारच्या सुमारास आंघोळीसाठी येथील धनगरवाडी मागे काळू नदीवरील पात्रात गेले होती. साईनाथ,जिवन व साईनाथ हे पोहण्यासाठी पाण्यात उतरले. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तिघे बुडू लागले. हे नदी काठावर बसलेल्या दोन मुलांच्या लक्षात आले. त्यांनी या घटनेची माहिती त्यांच्या घरी दिली. माहिती मिळताच भोईर कुटूंबातील मंडळी व मांडा कोळी वाड्यातील संपूर्ण लोकांनी नदीकडे धाव घेतली. परंतु मुलं बुडाली होती. त्यांना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. घटनास्थळी टिटवाळा पोलीस देखील दाखल झाले होते. नदीकाठी लोकांची कमालीची गर्दी झाली होती. भोईर कुटूंबावर अचानकपणे सणासुदी काळाने असा घाला घातल्याने येथे रडण्याचा आक्रोश ऐकू येत होता. या घटनेची माहिती मिळताच परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. टिटवाळा पोलीसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी रूक्मीणीबाई रूग्णालय पाठविले आहेत.