ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. १८ - शासकीय आश्रमशाळेच्या प्रांगणात जेवणानंतर खेळणा-या सहावीच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशाने बळी गेल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यांतर्गत येणाºया अंतरगाव येथे रविवारी दुपारी घडली. शाळा परिसरात मोठ्या प्रमाणात झुडुपे वाढले असून या शाळा प्रशासनाचे मात्र त्याकडे दुर्लक्ष आहे. परिणामी एका निरागस बालकाला आपला जीव गमवावा लागला.
आदित्य रवी टेकाम (११) रा. रुंझा (ता.पांढरकवडा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. रविवार १७ जुलै रोजी शाळेला सुटी असल्याने दुपारच्या जेवणानंतर सर्व विद्यार्थी नेहमीप्रमाणे आश्रमशाळेच्या प्रांगणात खेळत होते. आदित्य टेकाम व त्याचे काही मित्र आश्रमशाळेच्या प्रांगणात असलेल्या रंगमंचाकडे खेळण्यासाठी गेले. हा संपूर्ण परिसर झुडुपाने व्यापलेला आहे. या ठिकाणी खेळत असताना काही तरी चावल्याचे आदित्यच्या लक्षात आले. त्याने हा प्रकार सोबतच्या सहकाºयांना सांगितला. थोड्या वेळातच त्याची प्रकृती गंभीर होत गेली. त्यावेळी सर्पदंश झाल्याचे स्पष्ट झाले.
आश्रमशाळेतील कर्मचाºयांनी थोडाही विलंब न करता त्याला मेटीखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविले. प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री ८.३० वाजता त्याची प्राणज्योत मालवली. आदित्य हा रुंझा येथील एका गरीब कुटुंबातील मुलगा आहे. आठ दिवसापूर्वीच त्याने या आश्रमशाळेत प्रवेश घेतला होता. दरम्यान पांढरकवडा येथील आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी दीपककुमार मीना (आयएएस) यांनी आदित्यच्या कुटुंबाला ७५ हजार रुपये दिले जाणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
वॉलकंपाऊंंड वाहून गेले
अंतरगाव शासकीय आश्रमशाळेचे वॉलकंपाऊंड पाच वर्षांपूर्वी पुराने वाहून गेले. पुन्हा उभे करण्याची सोय संबंधित विभागाने लावली नाही. याच परिसरात गवत वाढले असून तेथेच रंगमंच आहे. पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असलेल्या या आश्रमशाळेत एकूण २२ कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये दोन अधीक्षक, मुख्याध्यापक, दहा शिक्षक, तीन स्वयंपाकी, चार कामाठी, एक चौकीदार आणि एक लिपिक आहेत. आदित्यला सर्पदंश झाल्यानंतर सर्व कर्मचाºयांनी तत्काळ रुग्णालयात हलविले.
मुख्यमंत्र्यांनी अहवाल मागितला
वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, अंतरगाव आश्रमशाळेतील आदित्य रवी टेकाम याचा सर्पदंशाने झालेल्या मृत्यूची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.