म्हाडाच्या एका घरामागे १२२ अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 05:55 IST2019-04-23T05:55:09+5:302019-04-23T05:55:20+5:30
चेंबूर, पवईत २१७ सदनिका

म्हाडाच्या एका घरामागे १२२ अर्ज
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळत असून २२ एप्रिलपर्यंत २६ हजार ६१७ जणांनी अनामत रकमेसह अर्ज दाखल केले आहेत. म्हणजेच एका घरामागे १२२ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी अजूनही एक महिना शिल्लक आहे. त्यामुळे दाखल अर्जांची संख्या आणखी वाढेल, असे म्हाडाकडून सांगण्यात आले.
म्हाडाच्या मुंबई मंडळाने चेंबूर, पवईतील २१७ सदनिकांसाठी सोडत जाहीर केली आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकांमुळे २३ एप्रिलची सोडत २ जूनला जाहीर होईल. लॉटरीसाठी अर्ज करण्याची मुदतही १३ एप्रिलवरून २४ मेपर्यंत वाढविल्याने अर्जदारांनाही अर्ज सादर करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणार आहे.
अनामत रकमेसह २६,६१७ आॅनलाइन अर्ज
लॉटरीसाठी सोमवारी संध्याकाळपर्यंत १ लाख ७३ हजार ९६७ जणांनी नोंदणी केली. तर, ४६ हजार ७१ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी २४ हजार ७७६ जणांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले, तर १ हजार ८४१ जणांनी आरटीजीएस/ एनईएफटीद्वारे अर्ज सादर केले. अशा प्रकारे २६ हजार ६१७ जणांनी अनामत रकमेसह आॅनलाइन अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित १९ हजार ४५४ जणांनी अद्याप अनामत रक्कम जमा केलेली नाही. २ जूनच्या सोडतीत जे अर्जदार अयशस्वी ठरतील त्यांना १० दिवसांत अनामत रक्कम परत दिली जाईल, असे म्हाडामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.