Join us  

२६/११ हल्ल्याचे सूत्रधार अजूनही मोकाट कसे?  परराष्ट्रमंत्र्यांचे यूनो, पाकला खडे बोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2022 5:51 AM

जेव्हा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची वेळ येते तेव्हा संयुक्त राष्ट्र संघ राजकीय कारणांमुळे ही कारवाई करण्यास असमर्थ ठरतो, अशा शब्दात जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र संघावर हल्ला चढवला.

मुंबई : दहशतवादविरोधी उपाययोजनांवरील संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादप्रकरणी पाकिस्तान, चीन या देशांसह संयुक्त राष्ट्र संघालाही खडे बोल सुनावले. 

जेव्हा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची वेळ येते तेव्हा संयुक्त राष्ट्र संघ राजकीय कारणांमुळे ही कारवाई करण्यास असमर्थ ठरतो, अशा शब्दात जयशंकर यांनी संयुक्त राष्ट्र संघावर हल्ला चढवला. त्याचबरोबर हाफिज सईदच्या मुलाला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यात केलेल्या अडवणुकीवरून चीनवरही त्यांनी निशाणा साधला. 

सूत्रधार सुरक्षित २६/११ हल्ल्याचे मुख्य सूत्रधार व ज्यांनी हल्ल्याचा कट रचला ते अजूनही सुरक्षित आहेत, त्यांना अजूनही शिक्षा झालेली नाही, असे सांगताना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद राजकीय कारणांमुळे काही प्रकरणात कारवाईत अयशस्वी ठरले असल्याची टीका त्यांनी केली. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना भारतात आणण्याचे काम अपूर्ण राहिले असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

सामूहिक लढाई हवी : शिंदेदहशतवादविरोधी लढाई सर्वांनी एकजुटीने लढणे गरजेचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिषदेनंतर माध्यमांना सांगितले. ज्या ताज-महाल हॉटेलवर दहशतवादी हल्ला झाला तिथेच परिषदेचे आयोजन केल्याबद्दल संयुक्त राष्ट्र समितीला त्यांनी धन्यवाद दिले.

टॅग्स :भारतपाकिस्तानसंयुक्त राष्ट्र संघ