Join us  

निवडणुकीच्या तोंडावर ३० टक्के पाणी कपात

By admin | Published: October 20, 2015 11:38 PM

१४ लाख कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना आठवडाभर २४ तास पाणी योजना देण्यास सत्ताधारी युती सपशेल फेल ठरल्याने पाणी असूनही त्यांचा घसा कोरडाच आहे. नियोजनाअभावी

- अनिकेत घमंडी,  डोंबिवली१४ लाख कल्याण-डोंबिवलीकर नागरिकांना आठवडाभर २४ तास पाणी योजना देण्यास सत्ताधारी युती सपशेल फेल ठरल्याने पाणी असूनही त्यांचा घसा कोरडाच आहे. नियोजनाअभावी आता दर मंगळवारसह शनिवारी महापालिका ३० टक्के पाणीकपात करणार आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने सुरु झाल्याने महिलांमध्ये प्रचंड असंतोष आहे. एकीकडे जेएनएनयूआरएमअंतर्गत प्रकल्पातील दोन जलशुद्धीकरण केंद्रे तयार असूनही केवळ ती लालफितीच्या धोरणात अडकली आहेत. असे असतांनाच शिवसेना कार्याध्यक्षांनी दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये या योजनेचे लोकार्पण केले जाईल, असा डंका का पिटला होता. असा सवाल निर्माण झाला आहे.त्यांनी मध्यंतरी दौरा करून नेतीवली आणि मोईली या नव्याने बांधलेल्या केंद्रामधील पाणी शुद्धीकरणाची चाचणीही अंतिम टप्प्यात आल्याचे सांगून महिनाभरात नागरिकांना २४ तास पाणी मिळेल असे सांगितले होते. त्याचे काय झाले? तत्कालीन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनीही प्रसिद्धी माध्यमांसह नागरिकांना हेच आश्वासन दिले होते. त्यातून काय साध्य झाले? ही पाणी कपात का ओढवली?, या योजनेचा फियास्को झाला का?, त्यास जबाबदार कोण? असे सवाल नागरिकांमधून व्यक्त होत आहेत.महापालिका हद्दीत सध्या २७ गावे धरुन दिवसाला सुमारे ३५० दशलक्ष लिटर पाणी वितरीत केले जाते. त्या गावांना एमआयडीसीकडून पाणीपुरवठा केला जातो. ती वगळता महापालिकेकडून सुमारे ३०५-१० एमएलडी पाणी वितरीत केले जाते. या ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या आंध्रा आणि बारवी या दोन्ही धरणांमधील पाणीसाठा खालावलेला असून एका ठिकाणी अवघा ३५/४० टक्के तर दुसऱ्या ठिकाणी केवळ ५६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. महापालिकेच्या ६५ हून अधिक जलकुंभांमधून पाणीपुरवठा केला जातो. तसेच सुमारे ७० हजारांहून अधिक पाणी मीटर्स असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून मिळाली. एकूण पाण्यापैकी सुमारे १५० एमएलडी पाणी उल्हास नदीतून, ९०-९५ दशलक्ष लिटर पाणी एमआयडीसीकडून तर अन्य ७ दशलक्ष लिटर पाणी टिटवाळ्याच्या माध्यमातून मिळते. एमआयडीसी स्वत: पाणी शुद्ध करुन देते. तसेच उल्हास नदी व टिटवाळ्याचे पाणी शुद्धीकरणासाठी बारवे जलशुद्धीकरण केंद्राचा वापर करण्यात येतो. त्यानंतर त्याचे वितरण केले जाते. त्यासाठी आणखी काही नवीन जलकुंभ बांधले असून त्यातूनही पाणी वितरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. पाणी गळतीला चाप लावण्यासाठी मिटर्स बसविले जाणार आहेत.