Join us  

बाप्पाला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून खत; मुंबईतील 'या' भागात सर्वाधिक निर्माल्य संकलन

By सचिन लुंगसे | Published: September 12, 2022 6:15 PM

बाप्पाला अर्पण केलेल्या निर्माल्यापासून खत तयार केले जाणार आहे. 

मुंबई: गणरायाच्या चरणी वाहिलेल्या पाने, फुले, दूर्वा इत्यादी निर्माल्याचा वेगळा विचार महानगरपालिकेने केला असून जमा झालेल्या तब्बल ५ लाख ४९ हज़ार ५१५ किलो निर्माल्यापासून सेंद्रीय खत तयार केले जाणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये सर्वाधिक निर्माल्य संकलन हे अनुक्रमे भांडुप (एस विभाग), अंधेरी पश्चिम (के पश्चिम) व बोरिवली पश्चिम (आर मध्य) या विभागांमध्ये झाले आहे. या निर्माल्यापासून सेंद्रीय खत करण्याची कार्यवाही महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार घन कचरा व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे, अशी माहिती उपायुक्त (घन कचरा व्यवस्थापन) डॉ. संगिता हसनाळे यांनी दिली आहे. 

गणपती बाप्पाला यंदाच्या गणेशोत्सवामध्ये अर्पण करण्यात आलेले सुमारे ५ लाख ४९ हज़ार ५१५ इतक्या मोठ्या प्रमाणातील निर्माल्य हे महानगरपालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये असणाऱ्या सेंद्रीय खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच आता ह्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरूवातही झाली आहे. पुढील साधारपणे एका महिन्याच्या कालावधीत ह्या सर्व निर्माल्याचे रुपांतर सेंद्रीय खतामध्ये होईल, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घन कचरा व्यवस्थापन खात्यामार्फत देण्यात आली आहे. तर तयार होणारे हे सेंद्रीय खत महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये असलेल्या झाडांना खत म्हणून वापरण्यात येणार आहे.

मुंबई शहराचे एक महत्वाचे सांस्कृतिक आकर्षण असणारा गणेशोत्सव दि. ३१ ऑगस्ट ते दि. ०९ सप्टेंबर २०२२ दरम्यान साजरा करण्यात आला. या उत्सवादरम्यान मुंबई शहर व उपनगरात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी ४१९ निर्माल्य कलश पुरविण्यात आले होते. त्याचबरोबर हे निर्माल्य गोळा करुन खत निर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी ३८१ वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. यानुसार सर्व २४ विभागांमधून गोळा करण्यात आलेल्या निर्माल्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 

गणेशोत्सव कालावधीत विसर्जनस्थळी व लगतच्या परिसराची साफसफाई करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचा-यांसह अशासकीय संस्थांकडून कामगारांची व्यवस्था दैनिक स्वरुपात करण्यात आली होती. या साफसफाई संबंधित कामांकरिता साधारणपणे ६ हजार पेक्षा अधिक मनुष्यबळ अव्याहतपणे कार्यरत होते. तसेच विसर्जनस्थळी व लगतच्या परिसरात जमा होणारा कचरा वाहून नेण्यासाठी अतिरिक्त वाहनांच्या सेवाही (डम्पर्स) पुरविण्यात आल्या होत्या, अशीही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्याद्वारे देण्यात आली आहे.

    १. ए विभाग - १,०१० किलो    २. बी विभाग - २५३ किलो    ३. सी विभाग - ९०० किलो    ४. डी विभाग – २२,२९६ किलो    ५. ई विभाग – १,३५५ किलो    ६. एफ दक्षिण विभाग – १२,७५० किलो    ७. एफ उत्तर विभाग – ६,५५० किलो    ८. जी दक्षिण विभाग – १३,३५५ किलो    ९. जी उत्तर विभाग – ३७,१५५ किलो    १०. एच पूर्व विभाग – ४६,२८० किलो    ११. एच पश्चिम विभाग – ११,८०० किलो    १२. के पूर्व विभाग – २९,७९० किलो    १३. के पश्चिम विभाग – ५९,५०० किलो    १४. पी दक्षिण विभाग – २७,४८५ किलो    १५. पी उत्तर विभाग – १७,५७९ किलो    १६. एल विभाग – ४५,४५० किलो    १७. एम पूर्व विभाग – ३६,९३३ किलो    १८. एम पश्चिम विभाग – ८,०५० किलो    १९. एन विभाग – ४,६८५ किलो    २०. एस विभाग – ७७,८२५ किलो    २१. टी विभाग – १३,६५५ किलो    २२. आर दक्षिण विभाग – ८,०७० किलो    २३. आर मध्य विभाग – ५५,७०० किलो    २४. आर उत्तर विभाग – ११,०८९ किलो

 

टॅग्स :मुंबईमुंबई महानगरपालिकागणेशोत्सव