लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात वर्षभरात ५४ वसतिगृहे सुरू करण्यात आली आहेत तर आणखी १८ वसतिगृहे येत्या जूनअखेर सुरू होतील, अशी माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी विधान परिषदेत दिली तसेच वर्षभरात ५४ ओबीसी वसतिगृह सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री सावे यांचे सभागृहात अभिनंदन केले.
विधान परिषदेत सदस्य अभिजीत वंजारी यांनी ओबीसी वसतिगृह आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरावेळी ते बोलत होते.
मंत्री सावे म्हणाले की, सुरू केलेल्या ५४ वसतिगृहांमध्ये २६ मुलांची आणि २८ मुलींची वसतिगृहे आहेत. मुंबई, आणि महानगर परिरसरातील इमारतीसाठी शासनाने भाडे वाढवून देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उर्वरित १८ वसतिगृहे येत्या शैक्षणिक वर्षांपासून म्हणजेच जून-जुलैमध्ये सुरू होतील. याशिवाय, ओबीसी विद्यार्थ्यांना मिळणारे विद्यावेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.