Join us

दिवसभरात मुंबईकरांची ६ ते ७ वाहने जाताहेत चोरीला; गेल्या दोन महिन्यांत ३६३ गुन्ह्यांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 13:49 IST

गेल्या वर्षभरात वाहन चोरीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या दप्तरी २५८९ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी १४४० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २०२३ मध्ये हाच आकडा २६७१ होता.

मुंबई : गेल्या २ महिन्यांत मुंबईतून ३६३ वाहने चोरीला गेली असून यातील अवघ्या १४० वाहनांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. या आकडेवारीतून दिवसाला ६ ते ७ वाहने चोरीला जात असल्याचे स्पष्ट झाल्याने मुंबईकरांची डोकेदुखी कायम असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षभरात वाहन चोरीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या दप्तरी २५८९ गुन्हे नोंद झाले. त्यापैकी १४४० गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. २०२३ मध्ये हाच आकडा २६७१ होता.

यावर्षी जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान मुंबईत विविध गुन्ह्यांसंबंधित ८१०८ गुन्ह्यांची नोंद झाली. त्यामध्ये वाहनचोरीच्या ३६३ गुन्ह्यांचा समावेश आहे. गेल्यावर्षी याच दोन महिन्यांत वाहनचोरीचे ४३४ गुन्हे नोंदवण्यात आले होते.

पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहनगुन्हेगारी नियंत्रणासाठी गस्त वाढविण्याबरोबरच आस्थापनांबाहेर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश पोलिसांकड़ून देण्यात आले आहे.  जेणेकरून गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल. तसेच नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कुठे पार्टची विक्री, तर कुठे बनावट क्रमांकाचा वापररस्त्यालगत उभ्या असलेल्या दुचाकी चोरून काही टोळी त्यांच्या पार्टची मुंबईसह मुंबई बाहेर विक्री करतात. मुंबईतही अनेक गॅरेजमध्ये याची कमी भावात खरेदी केली जाते. 

 भंगारामध्ये दुचाकी दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायची. त्यानंतर त्याच बनावटीची दुचाकी चोरून तिला भंगारातील दुचाकीचा नंबर चोरट्यांकडून दिला जातो. 

याप्रकारे चोरीची वाहने विकणाऱ्या अनेक टोळ्या मुंबई परिसरात सक्रिय असून त्यांच्यावर पोलिसांकड़ून कारवाई करण्यात येत आहे. काही ठगांनी बनावट क्रमांक लावलेल्या दुचाकीची सोशल मीडियावरही विक्री केल्याचे समोर आले आहे.

१४० गुन्ह्यांची  उकलमुंबईत आतापर्यंत दाखल वाहनचोरीच्या घटनांपैकी १४० गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना यश आले आहे. यात आतापर्यंत वेगवेगळ्या टोळ्यांंची, चोरांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. 

टॅग्स :कारचोर