Join us

हाजीअली दर्ग्यात जाण्यासाठी मुस्लिम बांधवाची मोठी गर्दी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 8:00 PM

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे राज्यात विविध सण साजरे करण्यात आले नव्हते.

मुंबई- आज 'ईद-उल-फित्र' म्हणजेच 'रमजान ईद'. देशभरात मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जात आहे. कोरोना निर्बंधांनंतर तब्बल दोन वर्षांनी देशात ईद साजरी केली जात आहे. अक्षय तृतीया आणि ईद एकाच दिवशी आल्याने पोलिसांनीमुंबई शहरात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता.

भोंग्यांच्या मुद्द्यावरून निर्माण झालेले राजकारण आणि त्यामुळे बिघडलेले वातावरण लक्षात घेता, दक्षिण मुंबईतील हाजीअली दर्ग्याजवळ जवळपास २०० पोलिसांची फौज तैनात करण्यात आली होती, अशी माहिती ताडदेव पोलीस स्थानकाचे वरिष्ठ निरीक्षक विवेक शेंडे यांनी दिली.

गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे राज्यात विविध सण साजरे करण्यात आले नव्हते. त्यामुळे आज 'ईद-उल-फित्र'च्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधवांची गर्दी होणार याची कल्पना होती. त्यानूसार आम्ही विशिष्ट योजना आखून हाजीअली जंक्शनवर २०० पोलिसांचा फौजफाटा ठेवण्याचा निर्णय घेतला, असं विवेक शेंडे यांनी सांगितले.

'ईद-उल-फित्र'च्या निमित्ताने दक्षिण मुंबईत असणाऱ्या हाजीअली दर्ग्यात मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव येत असतात. आज देखील हाजीअली दर्ग्यात जाण्यासाठी मुस्लिम बांधवाची मोठी गर्दी झाली. त्यामुळे दक्षिण मुंबईकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र वाहतुक कोंडी कशी कमी करता येईल, यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत होते.

टॅग्स :ईद ए मिलादमुंबईपोलिस