Join us  

आदित्य ठाकरे राहुल गांधींच्या यात्रेत; शिंदे गटाने साधला निशाणा, मंत्र्याचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2022 5:57 PM

हिवरा फाटा येथून आज दुपारी चार वाजता भारत जोडो यात्रेला सुरवात करण्यात आली.

मुंबई/नांदेड - देशातील संविधान आणि लोकशाही धोक्यात आहे. याविरोधात लढण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून भारत जोडो यात्रेत आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडली. ते भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी आज नांदेड येथे दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरेंच्या भारत जोडो यात्रेतील सहभागावरुन शिंदे गटाचे प्रवक्ते उदय सामंत यांनी आदित्य यांना टोला लगावला. तसेच, यावरुन बाळासाहेबांच्या विचारांचे खरे वारसदार कोण? हे महाराष्ट्राल दिसेल, असेही ते म्हणाले.mu

हिवरा फाटा येथून आज दुपारी चार वाजता भारत जोडो यात्रेला सुरवात करण्यात आली. यावेळी यात्रेचे स्वागत आमदार डॉ प्रज्ञा सातव यांनी स्वागत केले. त्यानंतर यात्रेत शिवसेनेचे आदित्य ठाकरे, विश्वजित कदम सहभागी झाले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी यात्रेला मिळत असलेल्या प्रतिसादावरही भाष्य केलं. मात्र, आदित्य यांच्या सहभागावरुन बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी टोला लगावला आहे. 

आदित्य ठाकरे आज भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. यासंदर्भात पत्रकारांनी उदय सामंत यांना प्रश्न विचारला असता, आपल्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांच्या पक्ष, संघटनेची ती भूमिका आहे, त्यावर मी काय बोलणार असे सामंत यांनी म्हटले. पण, आदित्य ठाकरे श्रीनगरपर्यंत जाणार आहेत का? असा खोचक सवालही सामंत यांनी केला. तसेच,  शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसबद्दल काढलेल्या विधानाची आठवणही सामंत यांनी करुन दिली. जर काँग्रेससोबत जाण्याची वेळ आली तर मी माझं शिवसेना हे दुकान बंद करेल, असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. मात्र, आज हे काँग्रेससोबत यात्रेत चालत आहेत, हे योग्य की अयोग्य हे आता महाराष्ट्रातील जनतेनं ठरवलं पाहिजे. बाळासाहेबांचा विचार हा काँग्रेससोबत न जाण्याचा होता, निष्ठेचा होता. त्यांचा विचार घेऊन कोण वाटचाल करतंय, हे महाराष्ट्रातील जनतेला दिसेल, असेही उदय सामंत यांनी म्हटले आहे. 

यात्रेला चांगला प्रतिसाद - आदित्य ठाकरे

यात्रेला प्रतिसाद चांगला आहे. माझ्यासोबत अनेक शिवसैनिक यात्रेत सहभागी झाले आहेत. सध्या राज्यात घटनाबाह्य सरकार आहे. खा. संजय राऊत यांच्या जामिनावरील निकालपत्रावरून सरकारी यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचे दिसते. देशात लोकशाही उरली नाही. राज्य सरकारला शिवी देणार मंत्री अब्दुल सत्तार चालतात, बंदूक काढणारे चालतात. राजकारण सोडून राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा,असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला.

दरम्यान, यात्रेत रस्त्यावर ठिकठिकाणी पारंपरिक वेशभूषा केलेल्या नागरिकांनी वाद्ये वाजवत यात्रेचे स्वागत केले. खास लातूर येथून आणलेला गजराज ही यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यात्रेत शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह शिवसैनिक सहभागी झाले होते. हिंगोली जिल्हा सीमेवर यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

टॅग्स :आदित्य ठाकरेशिवसेनाउदय सामंतराहुल गांधीभारत जोडो यात्रा