Join us  

शेतकऱ्यांनो घाबरू नका, सरकार तुमच्या पाठिशी; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 1:47 PM

शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन अजितदादांनी केले.

मुंबई – बीडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्याने फड पेटवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. यानंतर आता राज्य सरकारनं यावर प्रतिक्रिया दिली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनो घाबरू नका. ऊस गाळप संपवायचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका. सरकार तुमच्या पाठीशी आहे असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. जनता दरबार उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अजित पवार म्हणाले की, ऊसाचे काय होणार याची चिंता शेतकऱ्यांना आहे. सध्या गळीत हंगाम वाढला आहे. मे महिन्यात रिकव्हरी लॉस आहे. यावर साखर आयुक्त व सहकारमंत्री आढावा घेत आहेत. बीड जिल्हयात दु:खद घटना घडली आहे. आमच्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. परंतु शेतकऱ्यांनी धीर सोडू नये. आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन अजितदादांनी केले.

काय आहे प्रकरण?                  

बीडच्या गेवराई येथे दोन कारखान्यांकडून ऊस तोडून नेला जात नसल्याने निराश झालेल्या एका उत्पादक शेतकऱ्याने दोन एकर उसाला काडी लावून त्याच शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन मरण कवटाळले. गोड उसाच्या कडू कहाणीचा प्रत्यय ११ मे रोजी तालुक्यातील हिंगणगाव येथे आला. दरम्यान, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गेवराईत धाव घेऊन मृत शेतकरी कुटुंबाला धीर देत सर्व शासकीय मदत करण्याचे आश्वासन दिले.

नामदेव आसाराम जाधव (वय ३२, रा. हिंगणगाव) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांची हिंगणगाव शिवारात तीन एकर शेती असून, ऊस लागवड केलेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगामाई शुगर्सला त्यांनी गतवर्षी ऊस दिला होता. यंदा त्यांनी जयभवानी साखर कारखान्याकडेही नोंद केली होती. मात्र, कारखाने ऊसतोडीसाठी मजुरांच्या टोळ्या पाठवीत नसल्याने ते हेलपाटे मारत होते. त्यामुळे निराश झालेल्या नामदेव जाधव यांनी ११ मे रोजी दुपारी १२ वाजता उसाच्या फडाला आग लावली. काही वेळातच आगीने संपूर्ण फड कवेत घेतला. यात दोन एकरांवरील ऊस खाक झाला, तर स्थानिकांनी आग आटोक्यात आणल्याने एक एकरवरील ऊस बचावला.

टॅग्स :अजित पवार