Join us  

'घोडामैदान दूर नाहीय'; शिवसेना अन् संभाजी ब्रिगेडच्या युतीवर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 10:58 AM

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी लागणारी युती झाली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शुक्रवारी या युतीची घोषणा केली. 

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यानंतर शिंदे गटातील आमदार आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येक पक्ष आपला पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यामध्ये कोणाचं नुकसान होईल, कोणाला फायदा होईल हे आज सांगता येत नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले. 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांचं काम सुरु केलंय, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील बैठका घेतायत, आमचीही कामे सुरु आहेत. भाजपाही तयारी करतेय. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये त्यांची लोक कामे करताय, पण शेवटी घोडामैदान दूर नाहीय. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका ५-६ महिन्यात होती. त्यामध्ये 'दूध का दूध, पानी का पानी' दिसेल, असंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात प्रादेशिक अस्मिता चिरडून टाकत प्रादेशिक आणि इतर विरोधी पक्षांना संपवण्याची भाषा सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता टिकवण्यासाठी आणि शिवप्रेमातून शिवसेना-संभाजी ब्रिगेडची युती झाल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली. शिवसेना आाणि संभाजी ब्रिगेड यांनी एकत्र येऊन पुढची वाटचाल करावी. महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घ्यावेत. शेतकरी, आदिवासी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी एकत्र काम करावे, अशी इच्छा संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेआदित्य ठाकरेगुलाबराव पाटीलसंभाजी ब्रिगेड