Join us  

पुनर्विकासाला धारावीकरांचा विरोधच

By admin | Published: January 08, 2016 2:49 AM

धारावीतील झोपडीवासीयांना ३५0 चौरस फुटांचे घर देण्याचे आणि पुनर्विकासाच्या निविदा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तेजस वाघमारे,   मुंबईधारावीतील झोपडीवासीयांना ३५0 चौरस फुटांचे घर देण्याचे आणि पुनर्विकासाच्या निविदा काढण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घोषणेमुळे धारावीकरांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विरोधात असताना सेना-भाजपाचे नेते धारावीतील झोपडीधारकांना ४00 चौरस फुटांचे घर देण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. पण सत्तेत आल्यानंतर सेना-भाजपाने आपले आश्वासन पाळले नसल्याबद्दलही टीका होऊ लागली आहे. सरकारच्या निर्णयाबाबत धारावी बचाव आंदोलनामार्फत दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे.धारावीचा पुनर्विकास पाच सेक्टरमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार सेक्टर-५चे काम म्हाडाकडे सोपविण्यात आले आहे. तर उर्वरित चार सेक्टरचा पुनर्विकास धारावी पुनर्विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. शासन चाळ आणि इमारतींमधील रहिवाशांना झोपडीधारक ठरवत आहे. येथील जनतेवर हा अन्याय असून, त्याविरोधात तीव्र लढा उभारण्यात येईल, असे ब्लू स्काय संघटनेचे प्रतिनिधी विजय कांबळे यांनी सांगितले.काँग्रेसचा मात्र पाठिंबाआघाडी सरकारने जेव्हा ३०० चौरस फुटांच्या घराचा निर्णय घेतला होता तेव्हा याच शिवसेना-भाजपाने ४०० आणि ५०० चौरस फुटांच्या घराच्या मागणीसाठी आंदोलन केले होते. ४०० फुटांच्या घराचे आश्वासन देणाऱ्या भाजपा-शिवसेनेने आता ३५० फुटांचे घर देण्याची घोषणा केली. त्यांच्याच आश्वासनाला त्यांनी हरताळ फासला असला तरी आम्ही विरोधाची भूमिका घेणार नाही, असे मत आमदार वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. ४00 चौरस फुटांवर ठामआम्ही ४00 चौरस फुटांच्या घरासाठी आग्रही आहोत. या निर्णयाबाबत येत्या दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करण्यात येईल, असे धारावी बचाव आंदोलनाचे नेते आणि माजी आमदार बाबूराव माने यांनी सांगितले; तसेच इमारती, चाळींतील रहिवाशांना ७00 चौरस फुटांचे घर देण्यात यावे, असेही ते म्हणाले.चाळी आणि इमारतींमधील रहिवाशांना झोपडीधारक ठरविले आहे. त्याला आमचा ठाम विरोध आहे. आम्हाला झोपडीधारकांप्रमाणे देण्यात येणारे ३५0 फुटांचे घर मान्य नाही. आम्ही प्राधिकरणाकडे यापूर्वीही ७00 चौरस फुटांच्या घराची मागणी केलेली असून, या मागणीची रणनीती ठरविण्यासाठी आम्ही माटुंगा लेबर कॅम्पमधील रहिवाशांची बैठक रविवारपर्यंत आयोजित करणार आहोत, असे रिडेन फर्नांडो यांनी सांगितले.