Join us  

सात हजारांहून अधिक रहिवाशांना एअर इंडियाच्या वसाहतींचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:08 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एअर इंडियाने आपले मुख्यालय मुंबईतून दिल्लीला स्थलांतरित केल्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कलिना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : एअर इंडियाने आपले मुख्यालय मुंबईतून दिल्लीला स्थलांतरित केल्यानंतर कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. कलिना येथील कर्मचारी वसाहतीत ७ हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्यास आहेत. निर्गुंतवणुकीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना हे निवासस्थान सोडावे लागणार आहे.

चालू वर्षअखेरीस ही प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित आहे. एअर इंडियाच्या ताब्यातील वसाहती रिकाम्या करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना हवाई वाहतूक मंत्रालयाकडून प्राप्त झाल्या आहेत. मुंबई विमानतळालगत असलेल्या कलिना परिसरात १८४ एकरवर एअर इंडियाची विस्तीर्ण वसाहत आहे. एअर इंडियाचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मिळून सात हजारांहून अधिक रहिवासी वास्तव्यास आहेत. ही जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ताब्यात होती. खासगीकरणानंनतर ती आधी जीव्हीके आणि आता अदानी समूहाच्या ताब्यात आली आहे. जागेच्या मोबदल्यात वर्षाकाठी २४ कोटी रुपयांहून अधिक भाडे एअर इंडियाकडून वसूल केले जाते.

१९५६ साली या वसाहतीतील पहिली इमारत बांधून पूर्ण झाली. एअर इंडियाचे कर्मचारी साधारणपणे नियुक्तीनंतर वसाहतीतील घर रिकामे करतात आणि सेवानिवृत्तीच्या पैशांतून उपनगर वा नवी मुंबईत घर खरेदी करतात. बऱ्याच जणांची १० ते २० वर्षांची सेवा शिल्लक असताना घर सोडण्याची वेळ ओढवल्याने चिंतित असल्याचे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

........

अनेक क्रिकेटपटू घडले

एअर इंडियाच्या वसाहतीमधील मैदानात अनेक क्रिकेटपटू घडले. अगदी पृथ्वी शॉ, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे या साऱ्या खेळाडूंनीही हे मैदान गाजवले. या मैदानावर एमसीए नवोदित क्रिकेटपटूंसाठी विशेष शिबिरे आयोजित करते, तर बीसीसीआयच्या महिला संघाचे सराव सामनेही येथे भरविले जातात. वसाहतीत एअर इंडिया मॉडर्न स्कूल आणि एअर इंडिया आयडीयस स्कूल अशा दोन शाळा असून, तेथे आजमितीस ३ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.