Join us  

अंबरनाथ - बदलापूरचा गड शिवसेनेने राखला!

By admin | Published: April 24, 2015 3:55 AM

अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने वर्चस्व निर्माण करून सत्तेकडे वाटचाल केलेली आहे. या निवडणुकीत सेनेला पुन्हा सत्ता

अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने वर्चस्व निर्माण करून सत्तेकडे वाटचाल केलेली आहे. या निवडणुकीत सेनेला पुन्हा सत्ता मिळाल्याचा आनंद झाला असून स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेस आणि भाजपाला नगरसेवक वाढल्याचा आनंद झाला आहे. जागा घटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेवर आत्मचिंतन करण्याची पाळी आली आहे. त्यातच अंबरनाथमध्ये प्रभाव असलेल्या रिपाइं सेक्युलरला राष्ट्रवादीच्या चिन्हावर अवघ्या दोन जागा मिळाल्या आहेत. गेल्या पालिका निवडणुकीत ५० पैकी शिवसेना १६, रिपाइं सेक्युलर ९, राष्ट्रवादी ८, मनसे ६, काँग्रेस ३, भाजपा १ आणि अपक्ष ७ असा आकडा होता. या निवडणुकीत ५७ जागांपैकी २६ जागांवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. तर, रिपाइंचा आकडा ९ वरून २ वर आला आहे. राष्ट्रवादीचा आकडा ८ वरून ३ वर घसरला, तर मनसे ६ वरून २ वर गडगडला. भाजपाच्या पदरी १० जागा पडल्या आहेत. तर स्वबळावर निवडणूक लढविणाऱ्या काँग्रेसने ३ वरून ८ जागा जिंकल्या आहेत.