Join us  

Amit Thackeray Letter To Devendra Fadnavis: "पोलीस बांधवांना दिवाळी बोनस जाहीर करा..."; अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्री फडणवीसांना पत्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 4:24 PM

राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे.

मुंबई-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांचे पुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीलं आहे. राज्यातील पोलीस बांधवांना दिवाळी बोनस जाहीर करावा यासाठी अमित ठाकरे यांनी फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. 

ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी राज ठाकरेंनी केली मुख्यमंत्र्यांकडे महत्त्वाची मागणी

महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी राखण्यात आपले पोलीस बांधव दिवस-रात्र एक करतात. तुमच्या माझ्यासह सर्व नागरिक सणासुदीच्या दिवसांत सुट्टी घेऊन कुटुंबीय तसंच मित्रमंडळींसह जे काही आनंदाचे क्षण अनुभवतात ते याच पोलिसांच्या अविरत सुरक्षा सेवेमुळे. पोलीस बांधव आपल्यापैकीच आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळी साजरी करावीशी वाटत असेल, हे एक समाज म्हणून विसरुनच गेलोय. गेल्या अनेक वर्षापासूनचा चुकीचा सरकारी पायंडा मोडून पुन्हा एकदा पोलिसांना एक पगार दिवाळी बोनस देण्यास सुरुवात करावी. पोलीस बांधवांची यंदाची दिवाळी गोड करावी, अशी असं अमित ठाकरे यांनी फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. 

राज यांनी केली ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणीदुसरीकडे राज ठाकरे यांनीही आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची मागणी केली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर परतीच्या पावसाच्या तडाख्याने महाराष्ट्रातील शेतीचे अपरिमित नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य सरकारने युद्धपातळीवर आढावा घेऊन उपाययोजना कराव्यात आणि 'ओला दुष्काळ' जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

या वर्षी मान्सूनचा मुक्काम लांबला आणि त्यात परतीच्या पावसाने तर कहर केला. ह्या परतीच्या पावसाने खरीप पीकांचे अपरिमित नुकसान केलं आहे आणि एकूणच हवामान पाहता रब्बी हंगामाबाबतीतही शेतकरी बांधव चिंतातुर आहे.  ऐन पीक काढणीच्या वेळेस हा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पीक वाया गेलं आहे. ह्यावर सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत हे चांगलंच आहे, पण तेवढं पुरेसं नाही. सध्याची परिस्थिती पाहिली तर लक्षात येईल की शेतकऱ्यांचं राज्यभर झालेलं नुकसान इतकं मोठं आहे की राज्य सरकारने ‘ओला दुष्काळ’ जाहीर करावा, असं राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :अमित ठाकरेमनसेदेवेंद्र फडणवीस