डहाणू : गेल्या चार - पाच दिवसांपासून सुरु असलेला पाऊस आणि समुद्राच्या उच्चतम भरतीच्या पाण्यामुळे किनाऱ्यालगतच्या मच्छिमार वस्त्यांना लाटांचा तडाखा बसत असल्याने येथील सोनापूर, मांगेलआळी, किर्तन बंगला, दुबळपाडा, सतीपाडा इत्यादी किनाऱ्या वरील बहुसंख्य घरे कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान समुद्राच्या भरतीच्या पाणी ज्या खांजण जमिनीत पसरते. काही लोकांनी बांध बांधून अडविल्याने संध्याकाळी शेकडो संतप्त मच्छिमारांनी बांध फोडून पाण्याचा मार्ग मोकळा केला आहे.डहाणू समुद्र किनाऱ्यावरील पंधरा वर्षापूर्वी टाकण्यात आलेला दगडाचा धुप प्रतिबंधक बंधारा जमीनदोस्त झाल्याने समुद्राच्या उच्चतम भरतीच्या वेळी उंच लाटा अडविण्यासाठी शासनाने कोणतीच उपाययोजना न केल्याने या भागातील घरांवर उधाणाच्या लाटा धडकून दरवर्षी येथे असंख्य घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. दरवर्षी याबाबत नुकसानीचा पंचनामा महसूलखात्यामार्फत केला जातो. परंतु प्रत्यक्षात कुणालाही आर्थिक मदत दिली जात नसल्याने मच्छिमार तसेच आदिवासीत नाराजी व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे डहाणूपासून ते नरपड, आगर, चिखले या भागात वाळू चोरीच्या समस्येने येथील किनारा आणखीन खोल बनत चालला आहे. डहाणू येथील चंद्रसागर (पावडीपूल) येथील शेकडो एकर खांजण जमिनी हडप करण्याचे दृष्टिने काही अज्ञात विकासकांनी पूरक्षेत्रात मातीचे भराव घालून पूरक्षेत्राला बाधा आणली आहे.किनाऱ्याच्या वस्तीमध्ये पाणी घुसल्याने संतप्त ग्रामस्थांनी विकासकांनी बांधलेले बांध फोडून पाण्याचे मार्ग मोकळे केले. (वार्ताहर)
संतप्त ग्रामस्थांनी बांध फोडले
By admin | Published: June 18, 2014 11:51 PM