Join us  

'काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितलं...'; ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी आज वाचूनच दाखवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2023 10:54 AM

अनिल परब यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदवर देखील काही प्रश्न उपस्थित केले.

मुंबई: हिंदुत्वाच्या नावाखाली दडलेला भाजपचा बिभत्स चेहरा सर्वोच्च न्यायालयानं उघडा पाडला. काल सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर काही जणांनी आनंद साजरा केला. फटाके फोडले. मी भाजपाचे समजू शकतो. पण गद्दारांनी फटाके वाजवण्याचे कारण समजले नाही, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. आज पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी न्यायालयाच्या निकालावरुन अधिक स्पष्टीकरण दिले. 

महाराष्ट्राची बदनामी थांबली पाहिजे. सराकारनं लवकरात लवकर राजीनामा देणं गरजेचं आहे. आमची मागणी आहे की राज्यात लवकरात लवकर निवडणुका घ्यायला पाहिजे. विधानसभा अध्यक्षांची निवड कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे हेसुद्धा तपासणं गरजेचं असल्याचे विधान उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. विधासभा अध्यक्षांनी १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांनी जर काही वेडावाकडा निर्णय घेतला तर आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचं विधान देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी केलं. 

अनिल परब यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदवर देखील काही प्रश्न उपस्थित केले. काल त्यांनी सर्व अर्धवट सांगितले, असं आरोप अनिल परब यांनी केला. अनिल परब यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या प्रतमधील काही ठळक मुद्दे वाचून दाखवले. राज्यातील सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना शिंदे गटाच्या भरत गोगावले यांची प्रतोद पदाची नियुक्ती रद्द केली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांचाच व्हीप लागू होणार आहे, असा दावा अनिल परब यांनी केला.

ठाकरेंनी नेमलेला गटनेता आणि व्हीप योग्य , हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही परिस्थितीत शिंदे गटाचा बचाव होणार नाही. राज्य सरकार हे बेकायदेशीर आहे, असं आरोप अनिल परब यांनी यावेळी केला. एकनाथ शिंदे यांची गटनेतेपदाची निवडही रद्द केली आहे. त्याच्यावर निकालातून शिक्कामोर्तब झाला आहे. अजय चौधरी यांची गटनेतेपदी निवड कोर्टाने योग्य ठरवली आहे. यामुळे आता विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

संपूर्ण जगात महाराष्ट्राची बदनामी

देशाच्या आणि, महाराष्ट्राच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. संपूर्ण जगात महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरु आहेत. त्यांच्या नेतृत्वात देशात चुकीचा कारभार होत आहे. हे देशाला शोभत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. बदनामी करणाऱ्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवर घालावा अशी विनंती त्यांनी पंतप्रधान मोदींना केली. 

टॅग्स :उद्धव ठाकरेअनिल परबएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसमहाराष्ट्रातील सत्तासंघर्ष