Join us  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून घोषणा; जरांगे पाटलांनाही केलंय आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 3:59 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याची आठवण करुन दिली.

मुंबई - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा आंदोलकांवर बेछूट लाठीमार झाल्याने राज्यात संतापाचं वातावरण आहे. या लाठीमाराला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरून त्यांच्यावर टीका करण्यात येत आहे. तसेच, संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाईची मागणीही जोर धरत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भात आज प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याची आठवण करुन दिली. तसेच, महाराष्ट्र समाजासाठी ओबीसींना ज्या सवलती मिळतात, त्याही सवलती मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळे, हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. जालन्यातील घडलेला प्रकार हा घडायला नको हवा होता. मात्र, या घटनेची गंभीर दखल घेत तेथील एसपींची बदली करण्यात आली असून दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. 

एसपींना जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आलं असून दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे पदभार देण्यात आला आहे. तेथील उपविभागीय अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे. तसेच, पोलीस खात्याचे अॅडिशनल डीजी तिथं जाऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतील. पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून या सर्व घटनेची चौकशी होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच, जालन्यातील घटनेत आंदोलकांवर चुकीच्या पद्धतीने झालेल्या केसेस शासन माघारी घेणार, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. 

समिती १ महिन्यात अहवाल देईल. 

मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे, त्याची दखल राज्य शासनाने घेतली आहे. त्यासाठी, महसूल विभागाच्या सचिवांसह एक समिती गठित करण्यात आली असून १ महिन्यात समिती आपला अहवाल सादर करेल. जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार कुणबी समाजाच्या दाखल्यासंदर्भात लवकरच या समितीच्या माध्यमातून निर्णय होईल. 

फडणवीसांनी मागितली माफी

आंदोलनात जखमी झालेल्या मराठा आंदोलकांची सरकारच्यावतीने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षमा मागितली आहे. तसेच या प्रकरणाचे आदेश मुंबईतून, मंत्रालयातून आले अशी शंका व्यक्त करत फडणवीसांकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या शरद पवार यांनाही फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर केला गेला. खरं म्हणजे ही दुर्दैवी घटना आहे. तसेच अशा प्रकारच्या बळाच्या वापराचे समर्थन केलं जाऊ शकत नाही.  

टॅग्स :मराठा आरक्षणमराठाएकनाथ शिंदेजालना