Join us  

मुंबईतील आमदारांचा लेखाजोखा जाहीर, भाजपा टॉप ५ मधून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2017 3:43 PM

मुंबई, दि. 8 -  मुंबईतील विधानसभा सदस्यांचे (आमदार) या वर्षीचे रिपोर्ट कार्ड समोर आले आहे. सामाजिक संस्था प्रजा फाउंडेशनने माहिती अधिकारात मध्ये मुंबईतील 32 आमदारांचा लेखाजोखा उघड केला आहे. पहिल्या पाचामध्ये भाजपाच्या एकाही आमदाराला स्थान मिळवता आले नाही. पहिल्या चार क्रमांकार काँग्रेस आमदारांनी स्थान पटकावले असून अमिन पटेल यांनी गेल्यावर्षी प्रमाणे प्रथम क्रमांक मिळवला आहे. पाचव्या स्थानावर शिवसेना आमदार  सुनिल प्रभू आहेत. तर भाजपा आमदार अतुल भातखळकर प्रजाच्या अहवालात सहाव्या क्रमांकावर आहेत. प्रजानं जाहीर केलेल्या या अहवालात शेवटच्या क्रमांकावर भाजपा आमदार राम कदम यांचे नाव आहे. पहिल्या चार उत्कृष्ट आमदारांमध्ये अनुक्रमे अमिन पटेल, कालिदास कोळंबकर, अस्लम शेख आणि नसीम खान या चार काँग्रेस आमदारांची वर्णी लागली आहे.

 32 आमदार आणि चार मंत्री यांच्यातील  50 टक्के आमदारांविरोधात फौजदारी खटले दाखल झाले आहेत. या 18 आमदारांपैकी 12 आमदारांविरोधात आरोप पत्र दाखल झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विधानसभेत आमदारांनी अधिक प्रश्न विचारले आहेत. मात्र त्यात दर्जाहीन प्रश्नांचीच संख्या अधिक असल्याचे प्रजाच्या अहवालात म्हटले आहे.  आमदार राम कदम यांनी यावर्षी एकही प्रश्न विचारला नाही. तर तमिल सेल्वन आणि भारती लव्हेकर या आमदारांनी केवळ एक प्रश्न विचारला आहे.

विधीमंडळ अधिवेशन काळात आमदार किती दिवस सभागृहात उपस्थित राहिले, त्यांनी आपापल्या मतदारसंघात किती निधी खर्च केला, विधानसभेत किती वेळा आणि कोणत्या विषयावर भाष्य केले, प्रश्न विचारले, मागील निवडणुकीत किती संपत्ती जाहीर केली आणि त्यांच्या मतदारसंघात कोणते नागरी प्रश्न भेडसावत आहेत, कोणत्या प्रश्नांनी मतदार हैराण आहेत, मतदारसंघातील गुन्हेगारीविषयक पाच महत्त्वाचे प्रश्न, मतदारसंघातील आरोग्यविषयक समस्या आदी माहिती प्रजाने जमविली आहे. 

विधानसभेतील हजेरीबाबत सर्व पक्षांच्या आमदारांनी 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविले आहेत. शिवसेनेच्या आमदारांची सर्वाधिक म्हणजे 73 टक्के उपस्थिती होती. शिवसेनेचे गजानन कीर्तिकर, सुभाष देसाई, काँग्रसेचे भाई जगताप, भाजपचे आमदार गोपाळ शेट्टी, आणि सरदार तारासिंग हे आमदार हुशार आमदार म्हणून गणले गेले आहेत.