Join us  

मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर ब्ल्यू बॉटल जेली फीशचे आगमन; समुद्रात न उतरण्याचे आवाहन

By मनोहर कुंभेजकर | Published: August 04, 2024 12:40 PM

गेल्या दोन दिवसांपासून जवळपास मुंबईच्या सर्व बीचेसवर जेलिफिश यायला सुरुवात झाली आहे.

मुंबई-दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनारी जेली फीश येतात.गिरगाव  चौपाटी,जुहू चौपाटी,आक्सा चौपाटी या प्रमुख ठिकाणी जेली फीशची दहशत असते. यंदा पावसाळा उशिरा झाल्याने जेलिफिश आले नव्हते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून जवळपास मुंबईच्या सर्व बीचेसवर जेलिफिश यायला सुरुवात झाली आहे. अजून जेलिफिश चावल्याच्या घटना घडल्या नाही. आम्ही पालिकेच्या आरोग्य खात्याला कळवल्याची माहिती दृष्टी लाईफ सेविंग कंपनी प्रा. लि. चे निरीक्षक नितेश बाईत यांनी दिली.

तर आज सकाळी जुहू बीचबर ब्ल्यू बॉटल जेली फीश आले असल्याची माहिती जुहू बीचवरील जीवरक्षक मनोहर शेट्टी यांनी दिली. मुंबईच्या बीचेसच्या किनाऱ्यावर जेलिफिश  आल्याने पर्यटकांनी जुहू चौपाटी सह अन्य चौपाट्यांवर समुद्रात पाण्यात उतरू नका ब्ल्यू बॉटल जेली फीश पासून स्वतः ला वाचवावे.तर नागरिकांनी अनवाणी पाण्यात उतरू नये,समुद्रकिनारी फिरू नये असे आवाहन दृष्टी लाईफ सेविंग कंपनीने पर्यटकांना केले आहे.

गणपती विसर्जनापर्यंत जेली फीशचा समुद्रात वावर असतो. दर शनिवारी,रविवारी सुमारे २५००० पर्यटक जुहू व गिरगाव  चौपटीवर येतात. समुद्राचे आकर्षण असते, मात्र पर्यटक आमच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून खोल समुद्रात उतरू नये असे आवाहन त्यांनी केले.

कसे असतात जेली फीश

पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीच्या दिशेने जोरदार वारे वाहतात. समुद्राला भरती आल्यावर वजनाने हलके असलेले जेली फीश समुद्रकिनाऱ्या जवळ येतात. ब्ल्यू बॉटल जेली फीश हे  विषारी असून साधारणपणे हवा भरलेल्या निळ्या पिशवी सारखे असतात.त्यांच्या टेटॅकल्स पेशीमध्ये विषारी द्रव्य असून ते चावल्यावर असह्य वेदना होतात. पोर्तुगीज मॅन ओ वॉर या नावाने त्यांची ओळख आहे.

जेली फीश चावल्यावर काय करावे

जेली फीशचा मानवी संपर्क झाल्यावर ते कचकचून चावतात.त्यांच्या वेदना असह्य असतात.अश्यावेळी जिकडे त्यांनी चावा घेतला आहे,तिकडे प्रथमोपचार करून थंडावा मिळण्यासाठी गायीचे किंवा म्हशीचे शेण लावावे. बाम लावावा. बर्फाने चोळून लिंबू लावावे. जर जखम जास्त असल्यास जवळच्या हॉस्पिटलमध्ये जावे अशी माहिती महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी यांनी लोकमतला दिली.

टॅग्स :मुंबई