Assembly Election Result 2022: यूपी तो झांकी है, महाराष्ट्र बाकी है म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांना पवारांनी एका वाक्यात सुनावले, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 15:04 IST2022-03-10T15:01:05+5:302022-03-10T15:04:22+5:30
Assembly Election Result 2022: भाजपाकडून दिल्या जात असलेल्या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे.

Assembly Election Result 2022: यूपी तो झांकी है, महाराष्ट्र बाकी है म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांना पवारांनी एका वाक्यात सुनावले, म्हणाले...
मुंबई - उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाने दणदणीत विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. यूपी तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है अशा घोषणा महाराष्ट्रातील नेत्यांकडून दिल्या जात आहेत. दरम्यान, भाजपाकडून दिल्या जात असलेल्या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार शरद पवार यांनी एका वाक्यात उत्तर दिलं आहे. महाराष्ट्र तयार आहे. महाविकास आघाडी महाराष्ट्रात सत्ता टिकवेल आणि पुन्हा सत्तेत येईल, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांना महाराष्ट्रातील नेत्यांकडून दिल्या जात यूपी तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, अशा घोषणांबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्र तयार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता टिकेल आणि पुन्हा सत्तेत येईल. या निकालांनंतर महाविकास आघाडीतील पक्ष अधिक कष्ट घेतील आणि चित्र बदलतील, असे शरद पवार म्हणाले.
दरम्यान,चार राज्यातील जनादेश हा भाजपाच्या बाजूने आला आहे. तर केजरीवालांच्या दिल्लीतील कामगिरीमुळे पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा विजय झाल आहे. या जनादेशाचा आदर केला पाहिजे. आता पुढच्या काळात आम्ही सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपाविरोधात एक प्रभावी पर्याय देण्यासाठी किमान समान कार्यक्रम तयार केला पाहिजे, असे शदर पवार म्हणाले.
तसेच या निवडणुकीत काँग्रेसच्या उडालेल्या घसरगुंडीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, पंजाबमध्ये काँग्रेस कुठे पडली याबाबत विचार करणे हा काँग्रेसचा प्रश्न आहे. दरम्यान, निकाल सुरू असताना माझी कुठल्याही काँग्रेसच्या नेत्याशी चर्चा झालेली नाही. त्यांच्याशी न बोलता त्यांच्याबाबत बोलणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी सांगितले.