Join us  

आठवले गटाच्या भाजपाकडे पायघड्या

By admin | Published: February 03, 2017 3:48 AM

शिवसेना युतीतून बाहेर पडल्याने आपल्या पदरात जादा जागा मिळण्याच्या आशा करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय गटाचा भाजपाने

- जमीर काझी, मुंबईशिवसेना युतीतून बाहेर पडल्याने आपल्या पदरात जादा जागा मिळण्याच्या आशा करणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय गटाचा भाजपाने पुरता हिरमोड केला आहे. पहिल्यांदा ६०, नंतर ४५ वरून आता ३० जागांपर्यंतच्या तडजोडीसाठी तयारी दर्शविली आहे. तरीही अद्याप भाजपाने त्यांना कसलीही शाश्वती दिलेली नाही. त्यामुळे राज्यमंत्री आठवले यांनीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र भाजपाने अद्याप या बैठकीसाठी वेळ दिलेला नाही. त्यामुळे याबाबतचा निर्णय शुक्रवारी घेतला जाण्याची शक्यता आहे.उल्हासनगर महापालिका निवडणुकीत आठवले गट सेनेसमवेत जाण्याच्या तयारीत असल्याने भाजपाने त्यांना मुंबईसह अन्य सर्व ठिकाणी चर्चेविना झुलवत ठेवले आहे. त्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांमध्येही नाराजी वाढली आहे. सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह राज्यात स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर आठवले गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचा आपण सर्वात मोठा सहकारी पक्ष असल्याचा दावा करत १० महापालिका व २५ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जादा जागांसाठी आग्रह केला आहे. त्यानुसार मुंबईत २२७ पैकी किमान ६० जागा द्याव्यात, अशी मागणी सुरुवातीला आठवले यांनी जाहीर केली. मात्र भाजपा त्याकडे दुर्लक्ष करत चर्चेलाच पाचारण करत नसल्याने आरपीआयच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी ४० ते ४५ जागांची मागणीकडेही कानाडोळा केला. केंद्रात व राज्यात सत्तेत असल्याने कार्यकर्त्यांचे संघटन वाढल्याचा त्यांचा दावा आहे. त्यामुळे मुंबईसाठी आम्ही ३० ते ३५ जागांपर्यंतची तयारी दर्शविली आहे. मात्र त्याबाबतचा अंतिम निर्णय रामदास आठवले व मुख्यमंत्री यांच्या बैठकीनंतर होईल. उल्हासनगरात भाजपा १० जागा सोडण्यास तयार असल्यास त्यांच्याबरोबर अजूनही चर्चा होऊ शकते. अन्यथा स्वबळावर लढू. सेनेबरोबर मात्र युती करणार नाही.- अविनाश महातेकर, राष्ट्रीय सरचिटणीस, आरपीआय, आठवले गट