मुंबई - उत्तर मुंबईच्याकाँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी आज पोयसर डेपो येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाला भेट दिली. उर्मिला मातोंडकर आणि मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस व बेस्ट समिती सदस्य भूषण पाटील यांना बेस्टच्या कामगारांनी आणि युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आमंत्रित केलॆ होते. यावेळी उर्मिला मातोंडकर यांनी बेस्ट कामगारांच्या सर्व समस्या जाणून घेतल्या.
त्यावेळी उर्मिला मातोंडकर म्हणाल्या कि बेस्ट (BEST) ही मुंबईची शान आहे, मुंबईची लाईफ लाईन आहे, तिला जिवंत ठेवलेच पाहिजे, तिला वाचवणे गरजेचे आहे. मी माझ्या शालेय जीवनाचा संपूर्ण प्रवास बेस्टने केलेला आहे तसेच कॉलेजला हि मी बेस्टनेच जायची त्यामुळे बेस्ट हि नेहमीच माझ्या मनामध्ये आहे. परंतु आज बेस्टची दुर्दशा झालेली आहे. गेली २५ ते २७ वर्षे महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजपची सत्ता आहे त्यांनी नेहमीच बेस्टकडे दुर्लक्ष केले. बेस्ट कामगारांना बोनस मिळत नाहीत, वेळेवर पगार मिळत नाही. त्यांचे राहणीमान सुधारलेले नाही, अशा अनेक समस्या आहेत.
या कार्यक्रमाला उर्मिला मातोंडकर यांच्यासोबत भूषण पाटील आणि नितीन पाटील, अध्यक्ष, बेस्ट एम्प्लॉईज युनियन, बेस्ट कामगार युनियन, बेस्ट कामगार संगठन, राष्ट्रवादी बेस्ट युनियन आणि जागृत बेस्ट कामगार संगठन यांचे पदाधिकारी हि उपस्थित होते.