Anandacha Shidha Yojana ( Marathi News ) : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. काल अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्य सरकारने मागील वर्षी सुरु केलेली आनंदाचा शिधा ही योजना बंद केल्याची माहिती समोर आली आहे. ही योजना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळी सुरू करण्यात आली होती. या योजनेच्या माध्यमातून सणाच्या दिवशी १ कोटी ६३ लाख लोकांना लाभ मिळत होता.
या आनंदाच्या शिधाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो चना डाळ आणि एक लिटर पामतेल मिळत होते. दरम्यान, आता ही योजना बंद करण्यात आल्यामुळे रेशनकार्ड धारकांना मोठा फटका बसणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी काल मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये आनंदाचा शिधा या योजनेबाबत कोणतीही तरतूद केली नसल्याचे दिसत आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येकवर्षी दिवाळी, दसरा, गुढीपाडवा अशा सणांना आनंदाचा शिधा देण्यात येत होता.
दरम्यान, या योजनेवरुन आता काँग्रेस नेते भाई जगताप यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. भाई जगताप म्हणाले, या आधी शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा या योजनांचा निवडणुकीच्या काळात उपयोग करुन घेतला आणि आता त्या बंद केल्या जात आहेत. या माध्यमातून जनतेला गाजर दाखवण्याचं काम सुरू असल्याची टीका काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी केली.
विजय वडेट्टीवार यांनी केली टीका
काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी या योजनेवरुन राज्य सरकार टीका केली आहे. या योजनांचे महत्व संपले आहे आणि एकनाथ शिंदे यांचे महत्वही कमी झाल्याचे लक्षण एकूण या योजनांवर लक्ष घातले तर लक्षात येईल. म्हणजे मी तर असे म्हणेन की लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे यांचीच होती. दुर्देवाने या योजना आता बंदच करायचं ठरवले आहे. आनंदाचा शिधा ही योजना आता कुठेही तीही बंद करण्यात आली आहे, असंही विजय वडेट्टीवार म्हणाले.