Join us  

Ashish Shelar : "आम्ही वारंवार सांगतोय... लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय"

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 9:56 AM

BJP Ashish Shelar Slams Aaditya Thackeray : भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

आदित्य ठाकरे यांनी "घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांना लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला वेळ नाही. मुंबईकर म्हणून टोल भरतोय. परंतु पश्चिम द्रुतगती, पूर्व द्रुतगती महामार्गावर खड्डे पडलेत. एकदा सेटलमेंट करून टोलनाके बंद करावेत. MSRDC चं रस्त्यावर काडीमात्र काम करत नाही. त्यामुळे हे टोल बंद करावेत. हे दोन हायवे बीएमसीकडे दुरुस्तीसाठी दिलेत. मग हे टोल का भराय?" असा सवाल केला आहे. याला आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 

"मुंबईकर हो! आम्ही वारंवार सांगतोय, लबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय!!" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. "मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते, मुंबईकर हो तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा...!" असं म्हणत खोचक टोला लगावला आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. 

"गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत◆रस्त्यावर खड्डे पडले◆मुंबईची तुंबई झाली◆अनेकजण मॅनहोलमध्ये पडून वाहून गेले◆26 जुलैला तर अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त झाली◆झाड पडून काहीजण गेले◆संडासचा स्लॅब कोसळून काही मुंबईकर चिरडले■ तेव्हा मुंबईचे हे तथाकथित कारभारी युवराज म्हणाले नव्हते,मुंबईकर हो तुम्हाला आम्ही सेवा देण्यात कमी पडलो तुम्ही पालिकेला कर देणे बंद करा...!आज काय सांगतात, रस्त्यावर खड्डे पडले म्हणून टोल भरु नका!मुंबईकर हो! म्हणून आम्ही वारंवार सांगतोयलबाड लांडगा ढोंग करतोय, मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करतोय!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईकर एक कर बीएमसीला देते मग टोलनाक्याच्या माध्यमातून दुसरा कर कशाला? मुंबईतील पूर्व, पश्चिम द्रुतगती मार्गाची देखभाल होत नसेल तर मग टोल कशाला घेताय? रस्त्यावर खड्डे असतील तर MSRDC टोल कशाला घेते? हे सरकार पडल्यानंतर आमचे नवीन सरकार येणार आहे. ज्यादिवशी सरकार येईल तेव्हा आम्ही टोल बंद करू असंही त्यांनी म्हटलं.

तसेच आम्ही जनहिताचे विषय मांडतोय, आज टोलनाक्यावर आंदोलन केले तर नुकसान जनतेचे होईल. त्यामुळे आम्हाला आंदोलन करायचे नाही. जर सरकारमध्ये हिंमत असेल तर कंत्राटदारांच्या विरोधात जाऊन हे टोलनाके बंद करावेत. जर नाही केले तर आमचे सरकार येणारच आहे त्यामुळे आम्ही हे टोलनाके बंद करू असंही आदित्य ठाकरेंनी सांगितले. तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाकडे लक्षही दिले नाही. इलेक्ट्रिक बसेस आणल्या होत्या. मात्र आता बेस्टची अवस्था पाहा. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी  बैठकही घेतली जात नाही असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं. 

टॅग्स :आशीष शेलारआदित्य ठाकरेमुंबईभाजपाराजकारण