Join us  

“आमदार गेले, मंत्री गेले, सरकार गेले, तरी राऊत अद्याप पवारांची री ओढायचे काही थांबत नाही”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2022 11:21 AM

२५ वर्षे मविआ सरकार चालणार असल्याची भविष्यवाणी केली होती ती खोटी ठरली हे पण विसरलात, अशी टीका भाजपकडून करण्यात आली आहे.

मुंबई:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांनी जोरदार फटकेबाजी, टोलेबाजी करून सभागृह दणाणून सोडल्याचे पाहायला मिळाले. यानंतर मात्र हे सरकार किती दिवस टिकणार याविषयी तर्क-वितर्क केले जाताना पाहायला मिळत आहेत. यावरून भाजपने शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मध्यावधी निवडणुका लागतील, असा दावा करताच संजय राऊत यांनीही तशाच प्रकारची विधाने केली. नवे सरकार तात्पुरते असून, गुजरातसह महाराष्ट्रात निवडणुका घेण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच सामना अग्रलेखातूनही शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा हल्लाबोल करत हे सरकार केवळ ६ महिने टिकेल, असा दावा केला आहे. यावरून भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक ट्विट करून संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. 

राऊत अद्याप पवारांची री ओढायचे काही थांबत नाही

आमदार गेले, मंत्री गेले, सरकार गेल तरी अद्याप संजय राऊत हे शरद पवार यांची री ओढायच काही थांबत नाहीत. पवारसाहेब म्हणाले तेच पुढे आज अग्रलेखात. २५ वर्षे मविआ सरकार चालणार असल्याची भविष्यवाणी याच अग्रलेखातून केली होती ती खोटी ठरली हे पण विसरलात, असा टोला केशव उपाध्ये यांनी लगावला आहे. 

दरम्यान, सत्तेचा अमरपट्टा कुणीच सोबत घेऊन आलेले नाही. शिंदे यांचे सरकारही त्याच पद्धतीचे आहे. सुरत, गुवाहाटी, गोव्यातून ते सरकार एखाद्या सांगाड्यासारखे भाजपच्या रुग्णवाहिकेतूनच अवतरले. बहुमत चाचणी जिंकल्यामुळे पुढचे सहा महिने या सरकारला धोका नाही असे ज्यांना वाटते ते भ्रमात आहेत. भारतीय जनता पक्षाचे लोकच हे सरकार ठरल्यानुसार खाली खेचतील व महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुकांच्या खाईत ढकलतील. शिंदे यांच्या फुटीर गटास शुद्ध हेतूने सत्तेवर बसवण्याइतके या मंडळींचे मन मोठे नाही. शिवसेना संपत होती म्हणून आम्ही बंड केल्याचे भंपक विधान काही फुटीर आमदार करीत आहेत. तुम्ही संपाल, पण शिवसेना कधीच संपणार नाही. शिंद्यांचे बंड म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे बंड नाही व त्यांच्या सोबत जे बंडखोर गुळाच्या ढेपेस चिकटले ते म्हणजे कोणी क्रांतिवीर नाहीत. बंडखोरांचे बोलणे व डोलणे काही दिवसांचे आहे. सहा महिने सत्ता भोगा. हाच सगळ्याचा गोषवारा आहे, अशी घणाघाती टीका सामना अग्रलेखातून करण्यात आली आहे.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळसंजय राऊतशिवसेनाशरद पवार