Join us  

नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या, मग...; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 1:18 PM

या कटामागचे मास्टर माईंड कोण आहे हे समोर आले पाहिजे. ज्या आरोपींना पकडले त्यांना मुंबईतून हद्दपार करावं असं शेलारांनी सांगितले.

मुंबई – भाजपाचं पोलखोल आणि शिवसेनेचा डब्बागोल अशी अवस्था झाली आहे. भाजपाच्या रथाची तोडफोड करणाऱ्यांना अटक करा. आम्ही कोणाचं नाव घेत नाही. परंतु ज्या संघटनेने हे केले ते पळपुटे आहेत. पोलिसांनी या कटामागचा मास्टर माईंड शोधून काढावा. ज्या आरोपींना पकडले त्यांना कोर्टातून शिक्षा मिळेल परंतु त्यांना मुंबईतून हद्दपार करावं अशी मागणी भाजपा नेते आशिष शेलार(BJP Ashish Shelar) यांनी केला आहे.

भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले की, तुम्ही ५ वर्षात जी मुंबईकरांची फसवणूक केली त्याचा हिशोब घ्या. गेल्या २५ वर्षात विशेषत: मागील ५ वर्षात मुंबईकरांच्या खिशातून घेतलेल्या पैशांचा अपव्यय केला गेला. जे दगडफेक करतायेत. त्यांना एकच सांगतो, तारीख, वेळ तुमची दगडफेकीचं अभियान दोघं मिळून करू. नामर्दासारखं वागू नका. हिंमत असेल समोर या. पोलिसांनी या नामर्दांवर कारवाई करावी. मुंबई पोलिसांच्या कतृत्वाचं यश आम्हाला बघायचं आहे. या कटामागचे मास्टर माईंड कोण आहे हे समोर आले पाहिजे. ज्या आरोपींना पकडले त्यांना मुंबईतून हद्दपार करावं असं त्यांनी सांगितले.

तसेच दगडफेकीचं उत्तर जर तसेच दिले तर पुढील परिस्थितीला ठाकरे सरकार जबाबदार आहे. ज्या संघटनेने हल्ला केला ती पळपुटी आहेत. लवकरच आरोपींना अटक करू असं पोलिसांनी आश्वासन दिले आहे असंही आशिष शेलारांनी सांगितले. तर भाजपाच्या रथावर तोडफोड केली जाते त्यात कुणाला अटक करण्यात येत नाही त्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेला निशाणा साधला आहे. पोलखोल आम्ही रोज करतोय, ज्यांची पोलखोल होतेय ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे हल्ले सुरू आहेत. त्यांनी किती हल्लेही केले तरी पोलखोल होणार आहे असा इशारा फडणवीस यांनी शिवसेनेला दिला आहे.

शिवसेनेला बदनाम करण्याचं षडयंत्र

काहीही झालं तरी शिवसेनेवर नाव घ्यायची भाजपाला सवय आहे. पोलीस त्यांचा तपास करत आहे. चुकीच्या गोष्टीला पोलीस अभय देणार नाही. मुंबईचे पोलीस हल्लेखोरांना पकडण्यास सक्षम आहेत. भाजपाने आरोप करायचे ते करत राहू दे. शिवसेनेला बदनाम करण्याचं षडयंत्र भाजपाचं आहे. पोलखोल करण्यासाठी नियमांचे पालन करणं गरजेचे आहे. कुठेही स्टेज बांधायचे हे चालत नाही. लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. परंतु कायद्याचे पालन न करता मुंबईत अस्थिर वातावरण करायचं, महागाईबद्दल बोलायचं नाही. पेट्रोल डिझेल दरवाढीवर बोलायचं नाही. केवळ मुंबई महापालिकेवर लक्ष्य ठेवून ती मिळवण्यासाठी वाटेल त्या थराला जायचं हे काम भाजपा करतंय असा आरोप महापौर किशोर पेडणेकर यांनी केला आहे.   

टॅग्स :शिवसेनाआशीष शेलारभाजपा