Join us  

'शिवबंधन सैल झालं की काय?; आमदार मतदानाला जाण्यापूर्वीच खात्री करुन घ्यावी'; भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2022 9:12 AM

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी राज्यसभेच्या निवडणुकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबई- सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असलेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाची तारीख जवळ येत असताना सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष भाजपच्या गोटातील हालचालींना सोमवारी वेग आला. शिवसेनेचे बहुसंख्य आमदार बॅगा घेऊन मुंबईत दाखल झाले असून, पुढील तीन दिवसांसाठी त्यांची सोय ‘रिट्रीट’ हॉटेलमध्ये करण्यात आली आहे. 

वर्षा बंगल्याबाहेर आमदारांना नेण्यासाठी २ बसेस उभ्या करण्यात आल्या होत्या. आमदारांची बैठक पार पडल्यानंतर या आमदारांना बसमधून हॉटेल रिट्रिटमध्ये नेण्यात आले. तसेच हॉटेलबाहेर शिवसैनिकही आमदारांवर पहारा देणार आहेत. पोलिसांकडून तगडा सुरक्षा बंदोबस्त लावण्यात आला आहे.दरम्यान, आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याच्या शिवसेनेच्या चालीवर भाजपाने खोचक टीका केली आहे. 

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेच्या गोटात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग आला असून मुख्यमंत्र्यांकडून आमदारांना बॅगा भरून मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शिवबंधन सैल झालं की काय?, असा सवाल उपस्थित करत आमदार मतदानाला जाण्यापूर्वी ते घट्ट बांधलेलं आहे, याची खात्री करून घ्यावी, असा टोलाही अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, राज्यसभेच्या सहा जागेसाठी राज्यात चुरस निर्माण झाली आहे. या निवडणुकीत शिवसेनेने २ उमेदवार उतरवले आहेत. शिवसेना आमदारांची बैठक झाल्यानंतर आता भाजपाच्या आमदारांची ८ तारखेला बैठक होणार आहे. तर मंगळवारी काँग्रेस आमदारांचीही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला येताना बॅगा घेऊन या अशी सूचना काँग्रेसच्या आमदारांना देण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक पक्ष आमदार फुटू नये यासाठी खबरदारी घेत आहेत. 

आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पत्ते गुलदस्त्यात-

तीन आमदारांचे पाठबळ असलेल्या बहुजन विकास आघाडीची मनधरणी महाविकास आघाडीसह भाजपही करत आहे. वसई-विरारची कामे करणार, त्यालाच मते मिळणार, असे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केले. 

भाजपकडून घोडेबाजार, पटोले यांचा आरोप-

भाजपने कितीही घोडेबाजार केला, केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग कितीही केला तरी त्याचा काहीही परिणाम होणार नाही. महाविकास आघाडीचे चारही उमेदवार राज्यसभेची निवडणूक जिंकतील. - नाना पटोले, प्रदेश अध्यक्ष, 

टॅग्स :उद्धव ठाकरेअतुल भातखळकरशिवसेनाभाजपाराज्यसभा