भाजप नेत्याचे आफ्रिदीसोबत गुप्तगू; आदित्य ठाकरेंचा संताप; प्रश्नांची सरबत्ती करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 21:19 IST2025-02-24T21:19:30+5:302025-02-24T21:19:57+5:30
देशांतर्गत फूट पाडा, आपापसात भांडणे लावा, हिंदू-मुसलमानांमध्ये द्वेष पसरवा आणि सत्ता मिळवा, ही भाजपची नीती असल्याचा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला आहे.

भाजप नेत्याचे आफ्रिदीसोबत गुप्तगू; आदित्य ठाकरेंचा संताप; प्रश्नांची सरबत्ती करत म्हणाले...
Shiv Sena Aditya Thackeray: चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये काल भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना पार पडला असून या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला. मात्र या सामन्यावर आता राजकारण रंगलं असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. "अंधभक्त देशाला कुठे घेऊन जात आहेत याचे हे उदाहरण आहे. मोहम्मद शमी आणि जावेद अख्तर यांच्यावर त्यांच्या देशभक्तीबाबत शंका घेतली जाते; का तर केवळ त्यांच्या धर्मामुळे. दोघेही भारतीय, आपल्या कर्तृत्वाने देशाच्या गौरवात भर घालणारे! पण हेच ट्रोल्स त्या भाजप नेत्यावर बोलायला घाबरतात, जो आपल्या देशाच्या विरोधात उघडपणे बोलणाऱ्या क्रिकेटपटूसोबत काल बसलेला दिसला. ज्यांचा पक्ष प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यांना “पाकिस्तानला जा” असे वारंवार सांगतो, त्यांचे माजी मंत्री स्वतः रस्त्यावर “देश के गद्दारों को...." च्या घोषणा देतात, तेच काल शाहीद आफ्रिदीसोबत गप्पा मारत होते. मग सांगा, आता देशाचे गद्दार कोण? विचार करा, जर तो नेता भाजपचा नसता, तर काय झालं असतं? त्याच्याविरोधात आंदोलनं, FIR झाले असते! त्याला देशविरोधी ठरवले गेले असते! आणि त्यालाही “पाकिस्तानला जा” असे म्हटले असते! त्यावर ठराविक प्रसारमाध्यमांमध्ये वादविवाद झाले असते ते वेगळेच... दुर्दैवाने, हीच भाजपची नीती आहे; देशांतर्गत फूट पाडा, आपापसात भांडणे लावा, हिंदू-मुसलमानांमध्ये द्वेष पसरवा आणि सत्ता मिळवा," असा हल्लाबोल आदित्य ठाकरेंनी केला आहे.
भाजपवर निशाणा साधताना आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, "आताही हे पाकिस्तानात बसून आपल्या देशाबद्दल वाईट उद्गार काढणाऱ्यांसोबत गप्पा मारत बसले आहेत. यांचे नेते,नेत्यांची मुले परदेशी व्यवसाय करतात. काही तर देशविरोधी लोकांसोबत क्रिकेटच्या बहाण्याने पार्ट्या करतात,मॅच बघतात. बाकीच्यांची मुलं, आमचे तरुणांना मात्र - हे आपल्या राजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर घोषणा आणि आंदोलनात पुढे ठेवतात आणि हो, जेव्हा भाजपच्या सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांनी, बांगलादेशातील हिंदूंवर हल्ले होत असल्याचे सांगितले, तेव्हा ह्याच भाजपशासित BCCI ने मात्र सगळं माहीत असूनही त्याच बांगलादेशसोबत क्रिकेट सामना खेळवला," असं त्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, "निवडणुका झाल्याने भाजप आता हिंदूना विसरलंय आणि देशभक्तीही विसरंलय की मग आता भाजपच्या देशभक्तीचा 'टाइम प्लीज' आहे? जेव्हा ते तुम्हाला पुन्हा देशभक्ती आणि हिंदुत्व शिकवायला येतील, तेव्हा त्यांना त्यांच्या नेत्याचा, भारतविरोधी क्रिकेटपटूसोबत आनंद घेतानाचा फोटो दाखवा आणि विचारा, हे त्यांना मान्य आहे का? आमची देशभक्ती आणि हिंदुत्व स्पष्ट आहे, भाजपसारखी चुनावी नाही. देशप्रेम आणि हिंदुत्व म्हणजे एकमेकांचा आदर करु, पण कोणत्याही प्रकारचा तिरस्कार-द्वेष सहन केला जाणार नाही, कोणाकडूनही नाही, कोणासाठीही नाही," अशी रोखठोक भूमिकाही आदित्य ठाकरे यांनी मांडली आहे.