Join us  

पंतप्रधान मोदींचे कौतुक करून बृजभूषण भूमिका बदलत नाही; दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 10:52 AM

राज ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे.

मुंबई- मी अयोध्येचा दौरा करणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले. त्यांनीच अयोध्येत रसद पुरविली आणि मनसे कार्यकर्ते तिथे गेल्यावर त्यांना कसे सापळ्यात अडकवायचे त्यासाठी मदत केली. त्या सापळ्यात आपण अडकू नये, म्हणून अयोध्या दौरा रद्द केला. भोंगा आंदोलन मात्र सुरूच राहणार आहे, असे स्पष्टीकरण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी दिले. स्वारगेटच्या गणेश कला, क्रीडा मंच येथील सभेत राज ठाकरे बोलत होते.  

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावरही राज ठाकरेंनी निशाणा साधला. जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच महाराष्ट्रातल्या रेल्वे भरतीसाठी तिथून हजारो लोक महाराष्ट्रात रेल्वे स्टेशनवर आले. आपले लोक त्यांच्याशी बोलायला गेले होते. तिथे बोलता बोलता त्या बाचाबाचीत तिथल्या एका मुलाने आपल्या एका पदाधिकाऱ्याला आईवरून शिवी दिली. आणि जे सगळं प्रकरण सुरू झालं. ते तिथून झालं, असं राज ठाकरे म्हणाले.  

राज ठाकरेंच्या सभेनंतर शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टीका केली आहे. केसेस घेऊन पक्ष वाढत नाही. दौरे रद्द करून मुख्यमंत्री बनतां येणार नाही. मेळावे घेऊन महागाईवर बोलता येत नाही. मोदींचे कौतुक करून काय भेटणार, बृजभूषण काय तुमच्यासारखे भुमिका बदलत नाही, असा निशाणाही दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंवर साधला आहे.

तेव्हा कुठे होते हे हिंदुत्ववादी?-

राज ठाकरे म्हणाले, रेल्वे भरतीच्या जागा महाराष्ट्रात, पण जाहिरात मात्र उत्तर प्रदेशातील वृत्तपत्रात होती. भरतीसाठी उत्तर प्रदेशातून मुले आली होती. त्यांना विचारण्यासाठी कार्यकर्ते गेले होते. त्यातून राडा झाला. नंतर राज्यामध्ये जिथे जागा, तेथील वृत्तपत्रात जाहिराती सुरू झाल्या. टोल आंदोलन हाती घेतले आणि ६४ ते ७० टोलनाके बंद पडले. पाकिस्तानी कलाकारांना देशातून हाकलून दिले. त्यावेळी कुठे होते हे हिंदुत्ववादी, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

भोंगा आंदोलन सुरूच- 

भोंगे आंदोलनसुरू केले आणि पहिल्यांदाच असे घडले. पहाटेची अजान बंद झाली. ९४ टक्के भोंग्यांचा आवाज कमी झाला. हे आंदोलन एक दिवसाचे नाही. दोन-चार दिवसांत एक पत्र देणार, ते घराघरांत द्यावे. भोंगा प्रकरणात २८ हजार मनसे सैनिकांना नोटिसा गेल्या. भोंगा आंदोलन इथून पुढे सुरूच राहणार असल्याचे राज यांनी सांगितले.   

टॅग्स :राज ठाकरेमनसेदीपाली सय्यदशिवसेना