Join us

'दोघांना पक्षातून काढून टाका, अन्यथा...'; उदयनराजेंचा राज्यपाल अन् सुधांशू त्रिवेदी यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:39 PM

राज्यपालांच्या विधानावर आता भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. कोश्यारी यांच्यासोबतच भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही महाराजांवर केलेल्या वक्तव्याचा विरोधकांकडून तीव्र विरोध होत आहे. 

राज्यपालांच्या या विधानावर आता भाजपाचे खासदार छत्रपती उदयनराजे यांनी संताप व्यक्त केला आहे. भगतसिंग कोश्यारी यांना आता विस्मरण झालं असून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात केली पाहिजे. भगतसिंग कोश्यारींवर कारवाई केली नाही, तर मी माझ्या पद्धतीने योग्य वेळ आल्यावर जाहीर करेन, असा इशाराही उदयनराजे यांनी दिला. 

राज्यातील प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय समाजकार्यासह राजकीय वाटचालीला सुरुवात करत नाही. देशाला एकत्रित ठेवायचे असेल, तर छत्रपतींचे विचार जपावे लागतील; अन्यथा भविष्यात देशाचे तुकडे होतील. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्याला हटविणे, सरकारला जमत नसेल, तर त्यांची जीभ कशी हासडायची ते आम्ही बघतो, असं म्हणत राज्यपाल आणि सुधांशू त्रिवेदी यांना इशारा दिला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'जोपर्यंत चंद्र-सूर्य-तारे आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि देशाचे आदर्श असणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले, तर छत्रपती शिवाजी महाराज, हेच आमचे हिरो आहेत. कोणाच्याही मनात याबद्दल शंका नाही, राज्यपालांच्या मनातही याबद्दल शंका नसावी.'

पंतप्रधानांनी गांभीर्यानं दखल घ्यावी- अजित पवार

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले की, 'महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालिन, सर्वश्रेष्ठ आदर्श राजे आहेत. राजसत्तेचा उपयोग विलासासाठी नव्हे तर लोककल्याणासाठी कसा करता येतो, याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. छत्रपती शिवरायांना आदर्श मानून महाराष्ट्र आजवर घडला, यापुढेही घडत राहील. राज्यपालांच्या अनावश्यक, अनाकलनीय, निंदनीय वक्तव्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांभीर्यानं दखल घेण्याची वेळ आली आहे,' अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली. 

काय म्हणाले होते भगतसिंह कोश्यारी?

'आमच्या शालेय जीवनात तुमचा आवडता हिरो कोण? आदर्श कोण ? असे विचारले तर कोणी सुभाष चंद्र बोस, कोणी नेहरू असे सांगत. पण आता जर विचारले तुमचा हिरो कोण? आदर्श कोण ? तर कोठे बाहेर जाण्याची गरज नाही. येथे महाराष्ट्रातच तुम्हाला हिरो मिळतील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाचे झाले, डॉ. आंबडेकर ते गडकरी हे आजच्या युगाचे आदर्श आहेत,' असे मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केले होते.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :भगत सिंह कोश्यारीउदयनराजे भोसलेभाजपा