Join us  

Maharashtra Political Crisis: “तो ‘माजी’ सरकारी भाचा... “Mr India” झाला आहे का?”; भाजपचा खोचक सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2022 11:17 AM

Maharashtra Political Crisis: भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर खोचक शब्दांत टीका केली आहे.

मुंबई:शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नव्या शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला. यानंतर आता महविकास आघाडी, भाजप आणि शिंदे गटाचे लक्ष सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे लागले आहे. यातच आरोप-प्रत्यारोप सुरूच असून, भाजपने आता शिवसेनेवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले आहे. 

अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा या दाम्पत्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा निर्धार केला होता. त्यावेळी शिवसेनेसह युवासेनेने रस्त्यावर उतरून एल्गार केला होता. यावेळी युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई हेही आघाडीवर होते. राणा दाम्पत्याने सदर निर्धार मागे घेतल्यावर वरुण सरदेसाई यांनी बोचऱ्या शब्दांत टीका केली होती. मात्र, त्यानंतर एकनाथ शिंदेचे ऐतिहासिक बंड झाले. राजकीय सत्ता संघर्ष पराकोटीला पोहोचला, उद्धव ठाकरेंवर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावली, तरी वरुण सरदेसाई कुठेच दिसले नाहीत, यावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी टोला लगावला आहे. 

“Mr India” झाला आहे का?

नितेश राणे यांनी एक ट्विट केले असून, यामध्ये अप्रत्यक्षरित्या वरुण सरदेसाई यांना टोला लगावला आहे. तो ‘माजी’ सरकारी भाचा... “Mr India” झाला आहे का?, असा खोचक सवाल नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून केला आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे नवे सरकार स्थापन झाल्यावर भाजपकडून एकच जल्लोष करण्यात आला. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात जंगी स्वागत करून भव्य रॅली काढण्यात आली. 

दरम्यान, शिवसेनेचाच मुख्यंमत्री होणार असा निर्णय भाजपकडून घेण्यात आला व एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मी पुढाकार घेतला. आपण बाहेर राहून या सरकारला मदत करायची माझी तयारी होती. ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे तुमच्यासमोर येईल. मात्र, महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्या दोन महिन्यातच ही खदखद माझ्या लक्षात आली होती. या सर्व प्रकारावर मी नजर ठेवून होतो. योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम केला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.  

टॅग्स :महाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळनीतेश राणे भाजपाशिवसेना