काही दिवसापूर्वी सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. यावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राजकोट किल्ल्याला भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. या टीकेला आता भाजपाने प्रत्युत्तर दिले आहे.
"भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. उपाध्ये यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,'काँग्रेसपुढे कण्यातून वाकलेले आणि स्वहस्ते पक्षाची शकले केलेले जेव्हा दुसऱ्यांना हिणवण्याचे शाब्दिक चाळे करतात, तेव्हा हसून दुर्लक्ष करणंच योग्य असतं संजय राऊत तुम्हीच थोडासा स्वाभिमानाचा च्यवनप्राश घ्या आणि एखाद-दुसरा चमचा उद्धवजींना पण द्या...लाचारीच्या विषाणूने तसेही तुम्ही अशक्त झाला आहात. त्यामुळे येत्या निवडणुकीत तुम्ही टिकाव धरण्याची शक्यता नाही, असा निशाणा साधला आहे.
"म्हणूनच देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून सशक्त आहेत की अशक्त, याची उठाठेव करण्यापेक्षा स्वतःचा पक्ष सलाईनवर का गेलाय, याचं आत्मपरिक्षण करा, असंही या पोस्टमध्ये म्हटले आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
आज खासदार संजय राऊत यांनी राजकोट किल्ल्यावर भेट दिली. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, आम्ही तरुण कलाकारांना कायम उत्तेजन देत आलो आहोत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना अनुभव लागतो. कायदेशीर, सांस्कृतिक बाबींची पूर्तता करावी लागते. पण त्या पूर्ण केलेल्या नसून लोकांचा उद्रेक झाल्यानंतर सरकार जागे झाले. आदित्य ठाकरे, जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते येथे आले. त्यांना रोखण्यासाठी त्यांनी पक्षाचे गुंड रस्त्यावर उभे केले. पत्रकारांना घरात घुसून मारण्याची धमकी देण्यात आली. राज्यात गृहमंत्री आहे का? पोलिसांना घमक्या दिल्या जात आहेत. पोलीस आमदारांच्या गाड्या धूत आहेत. इतका दुबळा गृहमंत्री कधी पाहिला नाही, अशी टीका राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली.