Join us  

भाजपचे राज्यभर घंटानाद आंदोलन , ठाकरे सरकारची देवावर श्रद्धा नसल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 4:00 AM

काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अश्रद्ध झाले आहेत. गेले सहा महिने राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. अश्रद्ध राज्य सरकार दारू दुकान उघडते, मात्र मंदिर बंद ठेवते.

मुंबई/मिरज : राज्यातील बंद असलेली मंदिरे सुरू करावीत, यासाठी भाजपच्यावतीने शनिवारी राज्यभरात घंटानाद आंदोलन करण्यात आले. ‘उद्धवा दार उघड’ म्हणत चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली मिरजेतील दत्त मंदिरासमोर भाजपकडून घंटानाद आंदोलन करण्यात आले. घंटा, ढोल, झांज, टाळ, चिपळ्या, शंख आदी वाद्यांचा गजर करीत आंदोलकांनी महाआरती केली.चंद्रकांत पाटील म्हणाले, काँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेससोबत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही अश्रद्ध झाले आहेत. गेले सहा महिने राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. अश्रद्ध राज्य सरकार दारू दुकान उघडते, मात्र मंदिर बंद ठेवते. सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यापार, दुकाने, मंदिरे बंद केली होती. मात्र आता या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देऊन सर्व काही सुरू करण्यात येत आहे. दारू दुकान, हॉटेल, लॉज सर्व व्यापार आता सुरू झाला आहे, मात्र सरकारने अद्याप मंदिरे खुली केली नाहीत, त्यामुळे राज्यातील मंदिरे तातडीने खुली करावीत.उद्धव ठाकरेंचा आणि त्यांच्या वडिलांचा देवावर विश्वास होता. पण ठाकरे यांनी सोबत घेतलेल्या दोन भुतांचा देवावर विश्वास नाही, त्यामुळे तुमची पण देवावर श्रद्धा नाही, असे आता म्हणावे लागतेय, अशा शब्दांत पाटील यांनी टीका केली.

टॅग्स :लॉकडाऊन अनलॉकभाजपामहाराष्ट्र सरकार