Join us  

‘काळ्या’ ठेकेदाराला पालिकेत पायघड्या

By admin | Published: April 13, 2017 3:21 AM

पारदर्शक कारभारावर आक्रमक असलेल्या भाजपाने शिवसेनेला आज पुन्हा कोंडीत पकडले. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्रधिकरणाने (एमएमआरडीए) काळ्या यादीत

मुंबई : पारदर्शक कारभारावर आक्रमक असलेल्या भाजपाने शिवसेनेला आज पुन्हा कोंडीत पकडले. मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्रधिकरणाने (एमएमआरडीए) काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदाराला मिठी नदीच्या सफाईचे कंत्राट देण्यात येणार आहे. हा प्रस्ताव रद्द करण्याची सूचना काँग्रेस, भाजपा आणि समाजवादीने केली. मात्र, यावर शिवसेनेने मतदान घेत हा प्रस्ताव राखून ठेवला आहे. पावसाळ्यापूर्वी नाल्यांची व मिठी नदीची सफाई करण्यात येते. मात्र, नालेसफाईतील दीडशे कोटींचा घोटाळा उघड झाल्यानंतर, सफाईच्या कामांवर महापालिकेचे विशेष लक्ष आहे, परंतु प्रशासनाने या कामासाठी आणलेल्या ठेकेदाराला एमएमआरडीएतून हद्दपार करण्यात आले असल्याचे, विरोधी पक्षासह भाजपाने निदर्शनास आणले. हा प्रस्ताव रद्द करण्याची उपसूचना काँग्रेसचे आसिफ झकारिया यांनी मांडली. मात्र, शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने हा प्रस्ताव रद्द न करता, ठेकेदार मिठी नदीतून काढलेला गाळ कुठे टाकतो, यावर नजर ठेवण्याची उपसूचना उचलून धरली. शिवसेनेने या विषयावर आजच्या दिवसापुरती तहकुबी घेतली, परंतु काँग्रेसचे झकारिया माघार घेण्यास तयार नसल्याने, हा प्रस्ताव रद्द करण्याच्या उपसूचनेवर मतदान घेण्यात आले. त्यात मनसे आणि राष्ट्रवादीच्या मदतीने शिवसेनेने हा प्रस्ताव राखून ठेवला. (प्रतिनिधी)प्रस्तावावरून काँग्रेसमध्ये मतभेद हा प्रस्ताव रेकॉर्ड करण्याची मागणी काँग्रेसचे झकारिया यांनी केली. मात्र, विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी हा प्रस्ताव फेटाळल्यास, पावसात पाणी भरून नागरिकांची गैरसोय होईल, असा युक्तिवाद करीत शिवसेनेचे समर्थन केले. मिठी नदी सफाईचे कंत्राट श्याम नारायण यांच्या एस.एन.बी. इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लिमिटेड या कंपनीला देण्याचे प्रस्तावित आहे. मिठी नदीच्या सफाईसाठी तीन कोटी ४७ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. घोटाळा उघड झाल्यानंतरही नालेसफाईच्या कंत्राटात गोंधळ यंदाही कायम आहे. पर्यावरण विभागाची आधी परवानगी, तसेच नाल्यातील गाळ कुठे टाकणार आहेत, याची माहिती द्या, असे आव्हान भाजपाने केले. १९९२ पासून नालेसफाईत भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे नाले नाहीत, तर महापालिकेची तिजोरी साफ झाली असल्याचा आरोप भाजपाचे विद्यार्थी सिंह यांनी केला. शिवसेनेचा भाजपाला टोला नाल्यांमधील गाळ मुंबईबाहेरील गावांमध्ये टाकल्याने, तेथील पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचा मुद्दा उचलत, भाजपाने शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रकल्पासाठी चार हजार वृक्षांची कत्तल करणाऱ्यांचे पर्यावरणप्रेम कुठून जागे झाले? असा टोला सभागृह नेते यशवंत जाधव यांनी भाजपा गटनेते मनोज कोटक यांना लगावला.