Join us  

प्रभू श्रीरामांचा पदस्पर्श झालेल्या बाणगंगेच्या पायऱ्यांची नासधूस, BMC च्या कंत्राटदाराचा हलगर्जीपणा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 5:14 PM

बाणगंगा हे राज्य संरक्षित स्मारक आहे आणि अशा ठिकाणी जेसीबी मशीन वापरुन ऐतिहासिक पायऱ्या उद्ध्वस्त केल्याचं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने (ASI) मुंबई मनपाला कळवलं आहे.

मुंबई

मुंबई मनपाचा बेभरवशी कारभार उघडकीस आला आहे. अकराव्या शतकातील ऐतिहासिक बाणगंगा तलावाचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराने जेसीबी मशिन नेताना हेरिटेज पायऱ्यांची नासधूस केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसंच संबंधित कंत्राटदारासह मुंबई मनपावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

बाणगंगा हे राज्य संरक्षित स्मारक आहे आणि अशा ठिकाणी जेसीबी मशीन वापरुन ऐतिहासिक पायऱ्या उद्ध्वस्त केल्याचं भारतीय पुरातत्व सर्वेक्षणने (ASI) मुंबई मनपाला कळवलं आहे. बाणगंगा तलावाची मालकी असणारा आणि जीर्णोद्धाराच्या कामावर देखरेख करणाऱ्या GSB ट्रस्टने देखील BMC विरुद्ध निष्काळजीपणाबद्दल FIR दाखल करण्याची मागणी केली आहे. 

ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (प्रकल्प) रुत्विक औरंगाबादकर म्हणाले की, त्यांनी राज्य पुरातत्व विभागाला माहिती दिली होती. काम थांबवले आहे पण आम्ही विभागाला पत्र लिहू आणि राज्य स्मारक कायद्यांतर्गत एफआयआर दाखल केली जावी. बीएमसीच्या एका कंत्राटदाराने हा प्रताप केला आहे. ज्याला खरंतर तलावाच्या निर्जंतुकीकरणाचे काम देण्यात आले होते. त्यानं थेट जेसीबी मशिनने हेरिटेज पायऱ्या नष्ट केल्यात, ज्याची खरंतर त्याला परवानगीच नव्हती. हे धक्कादायक आहे". आता या पायऱ्या तातडीने दुरुस्त केल्या जातील असंही औरंगाबादकर म्हणाले. 

स्थानिक रहिवाशांनीही या घटनेवर नाराजी व्यक्त केली आणि संपूर्ण घटना सांगितली. "बीएमसीकडून पायऱ्यांवर रबरी फळी लावण्यात येईल त्यानंतर कोणतीही मशिनरी आत जाईल असं ठरलं होतं. पण एएसआय अधिकाऱ्यानं आम्हाला सांगितलं की कोणत्याही अवजड यंत्रसामग्रीसाठी कधीच परवानगी देण्यात आलेली नाही. दुपारी १ वाजता मी तिथं गेलो तेव्हा पाहतो तर त्या जेसीबी चालकानं पायऱ्यांची नासधूस केली होती. कोणत्या एजन्सीनं त्याला इथं प्रवेश करण्याची परवानगी दिली असा जाब विचारला पण तोवर उशीर झाला होता. वारसा हक्क असलेल्या पायऱ्या नष्ट झाल्या होत्या", असं स्थानिक रहिवासी आशिष त्रिवेदी याने सांगितलं. 

स्थानिक रहिवासी आशिष त्रिवेदी यांनी सांगितले की, बीएमसी पायऱ्यांवर रबरी फळी लावेल आणि त्यानंतर मशिनरी आणेल, असा निर्णय घेण्यात आला होता. "परंतु एएसआय अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की अशा अवजड यंत्रसामग्रीसाठी कधीही परवानगी देण्यात आलेली नाही," तो म्हणाला. “मी दुपारी १ वाजता तिथे गेलो तेव्हा मी ठेकेदाराला विचारले की कोणत्या एजन्सीने त्याला परिसरात प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे. वारशाच्या पायऱ्या दुर्दैवाने आता नष्ट झाल्या आहेत."

बाणगंगा हे केवळ वारसा स्थळ नाही. तर इथल्या तलावाच्या पायऱ्यांनाही धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वं आहे. प्रभू श्री रामांनी या ठिकाणी भेट दिली होती ते या पायऱ्या चढले होते. या घटनेनं स्थानिक खूप नाराज झाले आहेत, असंही त्रिवेदी म्हणाले. 

टॅग्स :मुंबई