Join us  

भिवंडीत सडलेल्या अवस्थेत सापडले चौघांचे मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 4:24 AM

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह गुरुवारी झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भिवंडी : गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या आईसह तीन मुलांचे मृतदेह गुरुवारी झाडाला सडलेल्या अवस्थेत लटकलेले आढळून आले. ही घटना भिवंडीतील पडघा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या उंबरखांड पाच्छापूर जंगलात घडली. पत्नी आणि तिन्ही मुलांचे मृतदेह पाहून वडिलांनीही विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेेत.

काही दिवसांपूर्वीच शहापूर तालुक्यातील खर्डीजवळच्या जंगलात अशाच प्रकारे तिघांचे मृतदेह आढळले होते. मात्र, तपासात या तिघांनी तंत्रमंत्र विद्या शिकण्यासाठी व अमर होण्यासाठी आत्महत्या केल्याचे समोर आले. श्रीपत बच्चू बांगारे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे नाव आहे. त्याची पत्नी रंजना (३०), मुलगी दर्शना (१२), रोहिणी (६) आणि मुलगा रोहित (९) या चौघांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत होते.

उंबरखांड गावातील श्रीपत यांनी २१ ऑक्टोबरला पत्नी व तीन मुले बेपत्ता झाल्याची तक्रार पडघा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. गुरुवारी दुपारच्या सुमारास श्रीपतचा भाऊ जंगलात लाकडे आणण्यासाठी गेला असता, त्याला एका झाडावरून दुर्गंधी आली. त्यामुळे त्याने पाहिले असता, झाडाला सडलेल्या अवस्थेत चार मृतदेह दिसले. मृतदेहांच्या अंगावरील कपड्यांवरून त्यांची ओळख पटल्याने घटनेची माहिती भावाने श्रीपतला दिली. त्यानंतर, पत्नी आणि तीन मुलांच्या मृत्यूची बातमी कळताच श्रीपतने स्वतःही विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पडघा परिसरात भीतीचे वातावरण

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ठाणे ग्रामीण विभागीय पोलीस अधिकाऱ्यांसह पडघा पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. फॅारेन्सिक पथकही घटनास्थळी आले होते. चौघांच्या मृतदेहाचे सांगाडे झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पडघा पोलीस सखोल तपास करीत आहेत.