Join us  

पुढच्या महिन्यात विश्रांती, ऑगस्टमध्ये १०-१२ दिवस पावसाचा खंड

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 8:52 AM

पुढील दोन महिन्यांत मोठ्या पावसाची शक्यता, राज्याला मिळणार जलदिलासा

सचिन लुंगसे मुंबई : जून कोरडाठाक गेल्याने सर्वांच्या तोंडचे पाणी पळविणारा पाऊस जुलैच्या सुरुवातीपासून राज्यात रुजू झाला. तेव्हापासून गेल्या आठवड्यापर्यंत वरुणराजाच्या कृपादृष्टीने संपूर्ण राज्य सुखावले आहे. बळीराजाला दिलासा मिळाला आहे, तर धरणांच्या जलसाठ्यांत घसघशीत वाढ झाली आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांतही किमान तीनदा तरी अतिवृष्टी होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे राज्याला जलदिलासा मिळणार आहे. 

अवघा महाराष्ट्र भिजला राज्यात १ जूनपासून ६०६ मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झाली असून, सरासरीच्या तुलनेत ४३ टक्के अधिकचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. राज्याची सरासरी ४२४.५ मिलीमीटर एवढी आहे. 

राज्यात पालघर, नाशिक, पुणे, उस्मानाबाद, बीड, परभणी, लातूर, नांदेड,   वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत ६० टक्क्यांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. 

 मुंबई उपनगर, ठाणे, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, भंडारा, गोंदिया, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांत २० ते ५९ टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. 

 मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यांत १९ टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याचे निवृत्त अधिकारी माणिकराव खुळे यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, ऑगस्ट महिन्यात दहा ते बारा दिवस पावसाचा खंड पडण्याची शक्यता आहे, तरीही जुलैसारखा पाऊस १५ ऑगस्टपर्यंत पडण्याची शक्यता आहे. जुलैतील कोसळधारांमुळे धरणे भरली असून, जुलैसारखे आणखी मोठे दोन ते तीन पाऊस ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पडतील. त्यामुळे धरणे काठोकाठ भरून वाहतील. २५ सप्टेंबरनंतर अवकाळी पाऊस सुरू होतो. शेवटच्या दहा ते बारा दिवसांत हा पाऊस पडतो. तेव्हाही मोठ्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही. 

 मुंबई शहर १,१२१.१  मुंबई उपनगर १,४७७  ठाणे १,५३५.६ पालघर १,७५०  रायगड १,७०५.५ रत्नागिरी १,७४९.५ सिंधुदुर्ग १,८९२.७  कोल्हापूर ९११.२  सांगली १३२.२  सातारा ४८१.८  सोलापूर १९२.७पुणे ६३३.८  नाशिक ७४६  अहमदनगर २०२.९  नंदुरबार ४४४.७  धुळे ३४२.४  जळगाव ३३२.४  औरंगाबाद ३३८.४  जालना २९२.९ बीड ३५८  उस्मानाबाद ३४५  लातूर ४६४.८  नांदेड ७१८.९  परभणी ४६४.१  जालना २९२.९  बुलडाणा ३३५.७  अकोला ३३८.५  वाशिम ३८८.९  हिंगोली ४१०.८  अमरावती ४१९.८  यवतमाळ ५२६.४  वर्धा ६७१.३  नागपूर ६६२.५  चंद्रपूर ६९९.२  भंडारा ६२०.१  गोंदिया ६१७.५ गडचिरोली ८६७.५

टॅग्स :पाऊसमुंबईपूर