Join us  

विद्यार्थिनींची बससेवा अडचणीत

By admin | Published: March 05, 2016 3:29 AM

राज्य शासनाच्या मानव विकास योजनेच्या अंतर्गत अनेक तालुक्यांत शाळेच्या मुलींची वाहतूक करण्यासाठी सुरु केलेल्या बससेवेचे १९0 कोटी रुपये सरकारने थकविले आहे,

मुंबई : राज्य शासनाच्या मानव विकास योजनेच्या अंतर्गत अनेक तालुक्यांत शाळेच्या मुलींची वाहतूक करण्यासाठी सुरु केलेल्या बससेवेचे १९0 कोटी रुपये सरकारने थकविले आहे, त्यामुळे ही योजना अडचणीत आली आहे. त्यातच एसटी महामंडळाच्या खर्चात दरवर्षी १० ते १२ टक्क्यांनी वाढ होत असल्याने खर्च भागवण्याचा प्रश्न जटील झाला आहे.एसटीकडून विद्यार्थिनींची बससेवा सुरू झाल्यानंतर त्याचा खर्च शासनाकडून होणे अपेक्षित होते. परंतु २0१३-१४ आणि १४-१५ मधील रकमेची तफावत आणि २0१५-१६ मधील प्रत्यक्षातील खर्च एसटीला शासनाकडून मिळाला नाही, त्यामुळे ही बससेवा सुरू ठेवताना अडचणी येत आहेत.राज्य शासनाने मानव विकास योजनेतील २0१२-१३ मध्ये १२५ तालुक्यांत शाळेच्या मुलींच्या वाहतुकीसाठी बससेवा चालविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ८६९ बसेस २0१२-१३ मध्ये चालविण्यात आल्या. त्याचा दरवर्षीचा चालनीय खर्च शासन देईल, असे मान्य करण्यात आले. मात्र सरकारने केवळ २0१२-१३ ची रक्कम दिली. मात्र २0१३-१४ आणि २0१४-१५ मध्ये प्रत्यक्ष खर्चावर आधारित निधी न देता त्याला कात्री लावण्यात आली. पहिल्या वर्षी प्रतिवाहन पाच लाख १० हजार रुपये शासनाने दिले. त्यात १३-१४ आणि १४-१५ मध्ये वाढ करून प्रतिवाहन सात लाख चार हजार रुपये खर्च दिला. प्रत्यक्षात या दोन वर्षांत प्रतिवाहन खर्च १0 लाख ते ११ लाख रुपये इतका झाला होता. त्यामुळे दोन वर्षांतील तफावत वाढलेली असतानाही, ती शासनाकडून प्राप्त झाली नाही. तर २0१५-१६ मधील खर्चापोटीची रक्कमच शासनाने दिली नाही. त्यामुळे अशा बससेवा पुढे चालविण्यात अडचणी येत आहेत. प्रवाशांना विविध सोयी सुविधा मिळाव्यात आणि त्यांचा दजार्ही वाढावा यासाठी हा सरकारकडून येणारा प्रलंबित निधी लवकर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)