Join us  

कोल्हापूरप्रमाणे मुंबईचाही टोल रद्द करा - राष्ट्रवादी काँग्रेस

By admin | Published: December 28, 2015 3:38 AM

सत्तेमध्ये येण्यापूर्वी भाजपाने टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली. कोल्हापूरकरांच्या तीव्र रोषाला सामोरे गेल्यानंतर शेवटी कोल्हापुरातील टोलनाके बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली

मुंबई : सत्तेमध्ये येण्यापूर्वी भाजपाने टोलमुक्त महाराष्ट्राची घोषणा केली. कोल्हापूरकरांच्या तीव्र रोषाला सामोरे गेल्यानंतर शेवटी कोल्हापुरातील टोलनाके बंद करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आता कोल्हापूरच्या धर्तीवर मुंबई प्रवेशद्वारावरील टोलनाकेही बंद करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी केली. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर शहरातील सर्वच्या सर्व टोलनाके बंद करण्याची अधिकृत घोषणाही केली. त्या बदल्यात टोल कंत्राटदाराला राज्य सरकार भरपाईची रक्कमही देणार आहे. याच न्यायाने मुंबईसह राज्यातल्या इतर शहरातील रहिवाशांनाही टोलपासून दिलासा मिळायला हवा. कोल्हापूरबाबत दाखवलेली आस्था मुख्यमंत्र्यांनी मुंबईबाबतही दाखवावी, असे अहिर म्हणाले. मुंबई देशाचे आर्थिक केंद्र आहे. मुंबईतून केंद्र सरकारला मोठा महसूल मिळतो. मात्र, या बदल्यात मुंबईकरांना योग्य सुविधा मिळत नाहीत. उलट बिघडलेली आर्थिक घडी सावरण्यासाठी सध्या केंद्र आणि राज्य सरकारने मुंबईकरांवर भरमसाट असे अतिरिक्त छुपे कर लावण्याचा उद्योग सुरू केला आहे. या छुप्या करांच्या ओझ्याखाली दबलेल्या मुंबईकरांना टोलमुक्तीच्या माध्यमातून किमान दिलासा देण्याची एक चांगली संधी मुख्यमंत्र्यांसमोर आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या धर्तीवर मुंबईकरांनाही टोलच्या जाचातून मुक्त करावे, अशी मागणी अहिर यांनी केली. (प्रतिनिधी)