Join us  

शेतकऱ्यांचा कळवळा म्हणजे 'फक्त दिखावा', पुढाऱ्यांनीच थकवलेत FRP चे 5323 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 3:55 PM

उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम न देणाऱ्या कारखान्यांची मालमत्ता जप्त करुन शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह द्यावेत.

मुंबई - ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुण्यात आंदोलन उभारले होते. शेतकऱ्यांना एफआरपी रक्कम आणि थकबाकी मिळवून देण्यासाठी शेट्टींनी हजारो शेतकऱ्यांना घेऊन पुण्यातील साखर आयुक्तालयाच्या कार्यालयावर ठाण मांडले. मात्र, खरा झोल तर राजकीय पुढाऱ्यांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी शेतकऱ्यांच्या ऊसाची तब्बल 5323 कोटी रुपयांची एफआरपी थकवली आहे. त्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीशी संबंधित नेत्यांकडे 1505 आणि 1503 कोटी रुपयांची थकबाकी आहे. 

उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम न देणाऱ्या कारखान्यांची मालमत्ता जप्त करुन शेतकऱ्यांचे पैसे व्याजासह द्यावेत, त्यासाठी कारखान्यांना रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) बजावावे, कारखान्याच्या संचालक मंडळावर फौजदारी कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून सोमवारी शेतकऱ्यांनी साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. तर, दिवसभर धरणे आंदोलनही केले. त्याची दखल घेत रात्री उशिरा साखर आयुक्त गायकवाड यांनी शेट्टी आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली.

राजू शेट्टींचे आंदोलन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी असले तरी, खरं पाणी तर राजकीय पुढाऱ्यांमध्येच मुरत आहेत. आमच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं असं सांगणारे आणि शेतकऱ्यांसाठी निर्धार करून रस्त्यावर उतरणारे नेतेच शेतकऱ्यांचे थकबाकीदार आहेत. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या एफआरपीचे 5323 कोटी रुपये चक्क राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संबंधित कारखान्यांनीच थकवले आहेत. त्यामध्ये भाजपाशी संलग्नित नेत्यांच्या कारखान्यांची संख्या 73 असून एफआरपीची थकबाकी 1505 कोटी रुपये एवढी आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी संलग्नित कारखानदारांची संख्या 53 असून त्यांच्याकडेही तब्बल 1502 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या यादीत काँग्रेस नेत्यांचा तिसरा क्रमांक लागत असून काँग्रेसशी संलग्नित नेत्यांच्या 44 कारखानदारांनी शेतकऱ्यांचे 1341 कोटी रुपये थकवले आहेत. 

राजकीय पुढाऱ्यांच्या या यादीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, केंद्रीयमंत्री नितिन गडकरी, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार, एकनाथ खडसे, विनय कोरे, हसन मुश्रिफ, बबन शिंदे, प्रकाश आवाडे, गणपत पाटील, हर्षवर्धन पाटील यांसह अनेक दिग्गज आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांची नावे आहेत. दरम्यान, याबाबत मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबतची माहिती शेअर केली आहे. तसेच, नेतेच असं वागले तर जनतेनं काय करायचं? असा सवालही शिदोरे यांनी विचारला आहे. 

 

टॅग्स :साखर कारखानेराजकारणराजू शेट्टीभाजपाकाँग्रेसराष्ट्रवादी काँग्रेसशिवसेना