Join us  

केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2024 6:29 PM

सरकारमधील जबाबदारीतून मला मोकळं करावं, अशी विनंती फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे.

BJP Chandrashekhar Bawankule ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर आता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मला पक्षसंघटनेत पूर्णवेळ काम करण्यासाठी सरकारमधील जबाबदारीतून मोकळं करावं, अशी विनंती फडणवीस यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे केली आहे. मात्र फडणवीस यांचा हा निर्णय आम्हाला मान्य नसल्याचं सांगत त्यांनी सरकारमध्ये राहून पक्षसंघटनेला बळकटी द्यावी, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडली आहे. 

"देवेंद्रजींनी सरकारमधून बाहेर पडून पूर्णवेळ पक्षासाठी काम करण्याची  भावना पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. परंतु, आम्ही त्यांना विनंती केली आहे की, त्यांनी सरकारमध्ये राहूनच संघटना आणखी मजबूत करावी. आम्हाला खात्री आहे की ते त्यांचा मनोदय मागे घेतील. केंद्रीय नेतृत्व त्यांची ही विनंती मान्य करणार नाही," अशी आशा चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर त्यांच्या सागर या शासकीय निवासस्थानाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. फडणवीस यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती या कार्यकर्त्यांकडून केली गेली आहे.

फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय?

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालावर भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "संविधान बदलाचा अपप्रचार, मराठा आरक्षण देऊनही त्याबाबत झालेला अपप्रचार असे काही मुद्दे होते. आता लवकरच आमची एक सविस्तर बैठक पक्षस्तरावर, दुसरी बैठक महायुतीतील नेत्यांच्या स्तरावर होईल. पक्षाचे सर्व नेते, कार्यकर्ते यांनी उत्तम काम केले, मी सर्वांचे आभार मानतो. महाराष्ट्रात अपयशाची संपूर्ण जबाबदारी मी स्वीकारतो आहे. मी पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करीन की मला विधानसभेसाठी पूर्णवेळ काम करण्याची अनुमती त्यांनी द्यावी. ते जो आदेश देतील त्याप्रमाणे पुढचे काम करीन," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, "मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने आरक्षण दिल्यानंतरही एक नरेटिव्ह करण्यात आला. त्यावर आम्ही प्रभावी उत्तर देऊ शकलो नाही. अनेक ठिकाणी त्याचा परिणाम झाला. मराठवाड्यात विशेष फटका बसला. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, त्याचा परिणाम झाला. उमेदवाराबाबतची नाराजी असेल, ती सुरुवातीला लक्षात आली नाही. मात्र, त्यानंतर ती हळूहळू लक्षात आली. त्यात आता पुढे सुधारणा करण्यात येईल. आम्ही जे प्रभावी काम केले आहे, ते पुढे नेण्याचे काम करू. प्रयत्न अधिक वाढवू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेऊ. समन्वयाचे काही विषय असतील, त्यावर चर्चा करू. एकूणच या निवडणुकीत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केले आहे. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रचंड मेहनत केली. प्रचंड फिरले. तळागाळापर्यंत जाऊन कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे काम, संघटित करण्याचे काम प्रदेशाध्यक्षांनी केले. मुंबई अध्यक्षांनीही पक्ष सक्रीय ठेवला. आम्हाला जागा कमी पडल्या असल्या तरी दोन्ही अध्यक्षांचे चांगले काम या निवडणुकीत केले, त्याबाबत त्यांचे अभिनंदन करतो. कितीही आकडेवारी मांडली तरी जागा कमी आल्या ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. या निवडणुकीचे नेतृत्व भाजपाकडून एकप्रकारे मी केले. त्यामुळे जो काही पराभव झाला असेल आणि जागा कमी झाल्या असतील, याची सगळी जबाबदारी ही माझी आहे. ती मी स्वीकारतो. मी मान्य करतो की, मी यात कमी पडलेलो आहे. ती कमतरता पूर्ण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे," असं देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केलं आहे.

टॅग्स :महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४लोकसभा निवडणूक २०२४लोकसभा निवडणूक २०२४ निकालदेवेंद्र फडणवीसचंद्रशेखर बावनकुळे